75 वर्षांपूर्वी 28 फेब्रुवारीला दिवशी ब्रिटिशांनी भारत सोडला. ज्या गेट वे ऑफ इंडियातून त्यांनी भारतात प्रवेशाची द्वाही फिरवली होती, त्याच गेट वे ऑफ इंडियातून त्यांना परत जावे लागले… त्याचा हा इतिहास!!
एका मागून एक प्रांत जिंकत गेल्यानंतरही हिंदुस्थान जिंकला, असं मानण्याचं धाडस इंग्रजांनी केलं नाही. १८१८ मध्ये पुण्याच्या शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवला तेव्हाच हिंदुस्थान जिंकल्याची द्वाही इंग्रजांनी फिरवली. दिल्लीतली सत्ताही इंग्रजांनी ताब्यात घेतली ती कोण्या बादशहाकडून नव्हे तर मराठेशाहीकडून. British went back to Britain from gate way of India 75 year back, a great historic story
यानंतर इंग्रजी सत्तेला सर्वात मोठं आव्हान १८५७ मध्ये उभं राहिलं. हिंदू मुस्लिमांच्या अभूतपूर्व युतीने केलेल्या या बंडात हिंदुस्थानी सैन्यानं दिल्लीतली इंग्रजांची सत्ता मर्यादीत काळासाठी का होईना ताब्यात घेतली होती. मराठे मुत्सदी-वीरांनी बहादुरशहा जफरला हिंदुस्थानच्या तख्तावर पुन्हा बसवलं होतं. १८५७ चं हे ऐतिहासिक स्वातंत्र्ययुद्ध भलेही गंगेच्या किनाऱ्यावर लढलं गेलं, पण त्याचे प्रणेते मराठे होते. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांनी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचं दिग्दर्शन केलं.
१८५७ च्या बंडानं इंग्रज अधिकच सावध झाले. राजनैतिक आंदोलनाच्या माध्यमातून भारतीयांच्या असंतोषाला वाट काढून दिली नाही तर आपल्याला इथं स्थिरावता येणार नाही, हे पक्कं लक्षात आल्यावर ब्रिटिशांनीच कॉंग्रेसची स्थापना केली होती. त्याच जोडीला क्रांतिकारी आंदोलनाची धगधगती ज्वाला पेटून उठली होती… या दोन मार्गांना समांतर स्वातंत्र्यलढ्याचं तिसरं अविभाज्य अंग होतं ते म्हणजे ब्रिटिश सैन्यातल्या हिंदुस्थानी सैनिकांचा उठाव.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर परखड होते. बुद्धिनिष्ठ होते. त्यांनी सन १९५१ मध्ये मुंबईतल्या जाहीर सभेत बोलताना स्पष्टपणे सांगितलं, “कॉंग्रेसची १९४२ ची चळवळ अयशस्वी ठरली. ‘१९४२ ची चळवळ मी कधी सुरु केलीच नव्हती,’ असे गांधी म्हणाले होते, याचा कॉंग्रेसवाल्यांना विसर पडला आहे. ही चळवळ फसली याचा एक पुरावा म्हणजे त्यानंतर गांधींनी वॅव्हेलची मुलाखत मागितली असता वॅव्हेलने त्यांना स्पष्ट नकार दिला. १९२१ पासून कोणत्याही व्हाईसरॉयने गांधींचा असा अपमान केला नव्हता.”
डॉ. बाबासाहेबांनी जे सांगितलं त्यातलं दुसरं तथ्य असं की हिंदी सैन्यानं ब्रिटिश निष्ठेला धक्का दिल्यानंतरच ब्रिटिशांचे पाय डगमगू लागले. ‘चले जाव’ म्हटल्यावर लगेच गपगुमान चालू लागायला ते गांधीजींचे अनुयायी अजिबातच नव्हते. ब्रिटिश सरकारची जुलूमजबरदस्ती त्यांचे पगारी नोकर असणाऱ्या हिंदुस्थानी सैनिकांच्या निष्ठेवर अवलंबून होती. याच हिंदुस्थानी सैन्याच्या रक्ताच्या बळावर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी स्वतःची लाज राखली. हे हिंदुस्थानी सैन्यच निष्ठा पालटू लागले तेव्हा खऱ्या अर्थानं ब्रिटिशांची घाबरगुंडी उडाली.
फेब्रुवारी १९४६ मध्ये मुंबई बंदरातील नौसैनिकांनी सर्वात मोठं बंड केलं. या बंडाचं लोण कोलकत्ता, कराची, चेन्नई बंदरातल्या नौसैनिकांपर्यंत पोहोचलं. देशभरातल्या शंभर बंदरांमध्ये ब्रिटिशांविरोधात आंदोलन उभं राहिलं. नौसैनिकांचं हे बंड शमवण्यासाठी अखेर ब्रिटिशांनी वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू यांची मदत घेतली. पटेल, पंडित यांच्या आवाहनानंतर नौसैनिकांनी नऊ दिवसानंतर आंदोलन मागे घेतलं.
नौसैनिकांच्या बंडानंतर ब्रिटिशांनी एक धडा घेतला तो म्हणजे हिंदुस्थानी सैन्यावर यापुढं अवलंबून राहता येणार नाही. भारतातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून इंग्लंडकडे खलितेच्या खलिते धाडले जाऊ लागले. गोपनीय अहवाल इंग्लंडला रवाना होऊ लागले. सगळ्याचा मथितार्थ एकच होता तो म्हणजे ‘भारत लवकरात लवकर सोडावा.’ भारतातल्या ब्रिटिश नागरिकांना सुरक्षित स्थळी म्हणजे आणिबाणीच्या प्रसंगी लगेच इंग्लडला जाणाऱ्या बोटीत बसता येईल, अशा बंदरांच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या गेल्या. हिंदुस्थानी सैन्य आता आपल्या हुकमतीखाली राहणार नाही, याची दहशत ब्रिटिशांनी बसली. कारण तत्कालीन हिंदुस्थानात ब्रिटिशांचं सैन्य सुमारे २५ लाख होतं. पण यातल्या अस्सल गोऱ्या ब्रिटिश सैनिक-अधिकाऱ्यांची संख्या लाखापेक्षाही खूप कमी होती.
सैनिकांच्या बंडानंतर भारताला स्वातंत्र्य देण्याची पावलं ब्रिटिशांनी गतीनं उचलली. वास्तविक ३० जून १९४८ ही भारताच्या स्वातंत्र्याची निश्चित केलेली तारीख होती. ती अलिकडं आणली गेली. फेब्रुवारीतल्या नौसैनिकांच्या बंडानंतर सप्टेंबर १९४६ मध्ये पंडित नेहरूंच्या नेतृत्वातल्या अंतरिम मंत्रिमंडळाचा शपथविधी इंग्रजांनी उरकून घेतला. भारतीय स्वातंत्र्याच्या मसुद्यावर स्वाक्षरी करणारे तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली १९५६ मध्ये कोलकात्यात आले होते. तेव्हाही त्यांनी हेच स्पष्ट केलं की भारतीय सैन्यातल्या असंतोषामुळं ब्रिटिशांना लवकर गाशा गुंडाळावा लागला. इतिहासाची ही बाजू आजही अनेकांसाठी झाकून ठेवण्याचा मामला आहे.
निर्धारित वेळेच्या आधी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी हिंदुस्थान सोडला. त्यांनतर नेहरूंच्याच विनंतीवरून भारतात मागे राहिलेले ब्रिटिश नौदल, वायुदल आणि पायदळातील सैन्याधिकारी पुढच्या दीड एक वर्षात टप्प्याटप्प्याने इंग्लंडला परतले. यात 28 फेब्रुवारी 1948 हा दिवस ऐतिहासिक, हे आज ‘गेट वे’वर गेल्यावर समजलं. बरोबर 75 वर्षांपूर्वी इंग्रजांची हिंदुस्थानातील अखेरची सैनिकी तुकडी मायदेशी ब्रिटनला रवाना झाली ती आजच्याच दिवशी. तीही मुंबईतून. काय योगायोग? ब्रिटिशांची हिंदुस्थानातील सत्ता पुण्यातल्या विजयानंतर प्रस्थापित झाली आणि गच्छंती झाली ती मुंबईतून. मुंबईतले ‘गेटवे ऑफ इंडिया’ पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी बांधले होते. याच ‘गेटवे’ मधून ‘गेट आउट’ होण्याची पाळी इंग्रजांवर आली. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारनं गेटवे ऑफ इंडिया इथं ‘लाईट अँड साऊंड शो’च लोकार्पण केलं. आज संध्याकाळी त्याचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहिला, त्याची ही गोष्ट.
ता. क. – अरबी समुद्रावरून येणारी वाऱ्याची थंड झुळूक खरं तर रोमँटिक. पण सोहळ्याच्या आरंभी भारतीय नौदलाच्या बँडने वाजवलेल्या बहारदार राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतामुळे माझ्याच काय ‘गेट वे’च्या दगडी अंगावरही रोमांच उभे राहिले. त्यांनतर शरद केळकरच्या भारदस्त ‘बाहुबली’ आवाजातला लाईट अँड साऊंड शो. मुंबईतलं आणखी एक आकर्षण वाढलं हे नक्की. पण याला इतकी वर्षं का लागली?
(सौजन्य : फेसबुक)
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App