विनायक ढेरे
नाशिक : दिल्लीत तालकटोरा स्टेडियम मध्ये झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन काल अजित पवारांच्या नाराजी नाट्य्यामुळे मुळे गाजले. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाषणे झाली पण अजित दादांचे भाषण झाले नाही. ते व्यासपीठावरून दोनदा उठून गेले. सुप्रिया सुळे यांना त्यांची समजूत घालून व्यासपीठावर परत बोलवावे लागले. जे काही मला बोलायचं ते मी महाराष्ट्रात येऊन बोलेन, असे अजित पवार म्हणाले.
पण राष्ट्रवादीचे अधिवेशन हे फक्त अजितदादांच्या नाराजी मुळेच गाजले असे नाही, तर ते दुसऱ्या कारणासाठी ही राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. ते म्हणजे महाराष्ट्रात “जाणता राजा” असलेले शरद पवार दिल्लीत गेल्यानंतर मात्र “अजीम ओ शान शहेनशाह” बनलेले दिसले आहेत!! कारण तालकटोरा स्टेडियम मधील राष्ट्रवादीच्या खुल्या अधिवेशनात व्यासपीठावर शरद पवारांचे आगमन होतानाच जोधा-अकबर सिनेमातले अजून “अजीम ओ शान शहेनशाह” हे गाणे वाजवले गेले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
तसेही शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करताना शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बिल्कीस बानू अत्याचार प्रकरण हे दोन विषय लावून धरले. त्यातही राष्ट्रीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीतही त्यांनी बिल्कीस बानू अत्याचार या मुद्द्यावरून केंद्रातल्या आणि गुजरात मधल्या भाजप सरकारला घेरले होतेच. बिल्कीस बानू प्रकरण सातत्याने लावून धरणाऱ्या शरद पवारांना राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक मताची बेगमी करायची असल्याचे दिसून आले.
महाराष्ट्रात पवारांचे समर्थक त्यांना “जाणता राजा” ही उपाधी देतात. वास्तविक ही उपाधी समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली होती. महाराष्ट्रात समर्थकांच्या उपाधीनुसार “जाणता राजा” म्हणून वावरणारे शरद पवार दिल्लीत गेल्यानंतर मात्र “अजीम ओ शान शहेनशाह”!! बनले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि समर्थकांनी पवारांवर या संदर्भात शरसंधान साधले आहे. पण भाजप समर्थकांनी अशी टीका केली असली तरी शरद पवारांनी मात्र बिल्कीस बानू प्रकरण लावून धरणे आणि “अजीम ओ शान शहेनशहा” हे गाणे त्यांच्या समर्थकांनी लावणे यातून राष्ट्रवादीच्या धोरणात्मक भविष्याची चुणूक मात्र दाखवून दिली आहे, हा मुद्दा विशेषत्वाने लक्षात घेतला पाहिजे.
अल्पसंख्यांक मतांच्या बेगमीसाठी धडपड
तिकडे दक्षिणेत तामिळनाडू आणि केरळमध्ये काँग्रेसचे राहुल गांधी आपल्या भारत जोडो यात्रेत देखील विविध चर्चेस आणि मशिदी यांना भेटी देऊन तसेच ख्रिस्ती धर्मगुरू आणि मिशनरी यांना भेटून काँग्रेससाठी अल्पसंख्यांक मताची बेगमी करताना दिसत आहेत, तर दिल्लीत पवार देखील राष्ट्रवादी काँग्रेससाठी तोच प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ काँग्रेस नाव धारण केलेले हे दोन पक्ष आपल्या मूळ धोरणाकडे म्हणजे अल्पसंख्यांक मतांची बेगमी मजबूत करण्याकडे परत वळल्याचेच स्पष्ट होत आहे. याचे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात नेमके काय आणि कसे परिणाम होतील??, हा भाग नंतरचा, पण पवार आणि राहुल गांधी यांच्यासारख्या दोन बड्या नेत्यांचे प्रयत्न त्यांच्या पक्षासाठी तरी कितपत यशस्वी होतील??, हे नजीकच्या भविष्यात समजणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App