उद्धव ठाकरे, शशिकला आणि यशवंत सिन्हा यांच्यात साम्य काय?? सगळे गेले उरले काय?? हे शीर्षक सुरुवातीला थोडे विचित्र वाटेल, पण तरी देखील या तिघांमध्ये एक विलक्षण राजकीय साम्य आहे. ते म्हणजे मोठा बलदंड वारसा असूनही आपल्या राजकीय (अ)कर्तृत्वाने स्वतःचे राजकीय भवितव्य गमावण्याचे!! Shivsena splits : similarities among Uddhav Thackeray – V. K. Sasikala and Yashwant Sinha
शशिकला – ठाकरे यांचा बलदंड वारसा
अर्थात यातल्या यशवंत सिन्हा यांना परंपरागत राजकीय वारसा नव्हता ही वस्तुस्थिती आहे. पण त्यांचे भारतीय प्रशासकीय सेवेतील कर्तृत्व मोठे होते हे नि:संशय. त्याच आधारे त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. पण उद्धव ठाकरे आणि शशिकला यांच्यात मात्र बलदंड वारशाचे निश्चित साम्य आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे असा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा वारसा आला तसाच शशिकला यांच्याकडे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचा वारसा आला होता. वास्तविक उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र. तशा शशिकला यांचा जयललिता यांच्याशी काहीही थेट कोणता संबंध नव्हता. पण केवळ जीवाभावाची मैत्रीण म्हणून त्यांच्याकडे जयललिता यांच्या निधनानंतर तो राजकीय वारसा आला होता. पण उद्धव ठाकरे काय किंवा शशिकला काय राजकीय कर्तृत्वाचा अभाव असला की काय घडते? बलदंड वारसा कसा पेलता येत नाही?? ही याची उत्तम उदाहरणे आहेत!!
पनीर सेल्वम आणि पलानीस्वामी
जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांनी अण्णा द्रमुक व पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जरूर केला. पण त्यांना ते जमले नाही. ओ. पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांनी अण्णाद्रमुकचे लोकप्रतिनिधी अर्थात आमदार खासदार आपल्या गटात जोडले आणि त्यांनी तामिळनाडू वर राज्य करून दाखवले. भले वर्षभरापूर्वीच तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालच्या अण्णा द्रमुकची सत्ता गेली असेल, पण त्यांचे आज देखील तामिळनाडूच्या विधानसभेत 53 आमदार विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेले दिसतात. ही संख्या थोडीथोडकी नव्हे!!
शशिकला यांची तुरुंगवारी
पण जयललिता यांची मैत्रीण म्हणून अण्णाद्रमुकचा वारसा चालवणाऱ्या शशिकला यांची राजकीय अवस्था काय आहे?? त्यांचा अण्णाद्रमुक नावाला अस्तित्वात उरला आहे आणि त्या स्वतः अवैध संपत्तीच्या मामल्यात तुरुंगाची वारी करत सध्या जामिनावर आहेत!!
एकनाथ शिंदे बरोबर 40 आमदार
उद्धव ठाकरे यांचे देखील फारसे वेगळे नाही शिवसेनेचे 40 च्या आसपास आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन पोहोचले आहेत. ते गुवाहाटीत सुरक्षित आहेत आणि उद्धव ठाकरे यांना “वर्षा” निवासस्थान सोडावे लागले आहे. त्यांचा मिलिंद नार्वेकरांच्या बरोबरचा मातोश्रीवर एकटे बसल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. मित्र प्रेमाचे प्रतीक म्हणून हा फोटो व्हायरल होणे ठीक आहे. पण त्यातून राजकीय लाभ काय?? शिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून वारशात मिळवलेली शिवसेना आपल्याबरोबर टिकवता आली नाही हे वास्तव त्यातून लपत नाही उलट ते अधिक ठळकपणे दिसून येते.
यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाचे उमेदवार
यशवंत सिन्हा यांचे थोडे वेगळे आहे. ज्या शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थान 6 जनपथ मध्ये बैठक घेऊन एक मोठी विरोधी आघाडी उभी करण्याचा यशवंत सिन्हा यांनी काही महिन्यांपूर्वी प्रयत्न केला होता, तो पूर्ण फसला. ते स्वतः लोकमंच या तथाकथित संघटनेतून शेवटी तृणमूल काँग्रेस मध्ये दाखल झाले आणि आता शरद पवारांच्या 6 जनपद निवासस्थानातून त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे. जी उमेदवारी स्वतः शरद पवार, फारूक अब्दुल्ला आणि गोपाळकृष्ण गांधी या तीन नेत्यांनी नाकारली आहे ती उमेदवारी शरद पवारांच्या याच 6 जनपथ निवासस्थानातून यशवंत सिन्हा यांच्या गळ्यात पडली आहे. हा देखील वेगळा आणि विलक्षण योगायोग आहे. पण यशवंत सिन्हा यांच्या पवारांच्या घरातून मिळालेल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे भवितव्य काय आहे??… तर निवडणुकीतला पराभव म्हणजे अपयश!!
पवारांच्या साथीत काय होते??
मग उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत तरी दुसरे काय घडले आहे?? ज्या शरद पवारांच्या भरवशावर संजय राऊत 25 वर्षे ठाकरे सरकार चालवणार होते, त्या ठाकरेंना 2.5 वर्षात मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा सोडावे लागले आहे. मुख्यमंत्री पद काही तासांचे फार तर काही दिवसांचे उरले आहे!!
या सगळ्या घटनाक्रमाचा नेमका अर्थ काय आहे??, तर बलदंड वारसा पेलता आला नाही की “शशिकला” होते आणि पवारांच्या साथीने राजकीय भवितव्य घडविण्याचा प्रयत्न केला की “यशवंत सिन्हा” होतो. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत हे दोन्ही एकाच वेळी घडले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App