श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही. त्याला आरक्षण दिले तर श्रीमंत मराठ्यांचे उंबरठे कोण झिजवणार? त्यामुळे गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. Rich Marathas in the hunt of poor helpless Marathas only : Prakash Ambedkar on Maratha reservation
प्रतिनिधी
पुणे : “गरीब मराठ्यांना श्रीमंत मराठ्यांनी लुटले अशी परिस्थिती आहे. श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते. त्यांना केवळ लाचार मराठा हवा आहे. त्याला आरक्षण दिले तर उंबरठा झिजवणारा मराठा कसा शिल्लक राहील,” अशी टीका ज्येष्ठ नेते, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
त्यामुळे आता गरीब मराठ्यांनी ठरवायचे आहे, की त्यांना त्यांच्या कोशातून बाहेर पडायचे आहे का? त्यांना फसवणारा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपही आहे. गरीब मराठा जोपर्यंत इतर पक्षांकडे बघायला तयार होत नाही, की जे आरक्षणाच्या बाजूचे आहेत, तोपर्यंत त्यांना आरक्षण मिळणार नाही, असे आंबेडकर म्हणाले.
शिवसेनेला आरक्षणाचे काही घेणे देणे नाही. भाजपा सुरुवातीपासूनच आरक्षणविरोधी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी केवळ श्रीमंत मराठ्यांच्या बाजूची आहे. गरीब मराठा जोपर्यंत सामाजिक आणि राजकीय ‘आयडेन्टिटी’ निर्माण करीत नाही, तोपर्यंत गरीब मराठ्यांना न्याय मिळणार नाही. त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण करायला हवी. आतापर्यंत श्रीमंत मराठ्यांचाच उदोउदो झाला, गरीब मराठ्यांना काहीच दिलं नाही. गरीब मराठ्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली पाहिजे. तेव्हा कुठे त्याला न्याय मिळेल,” असे आंबेडकर म्हणाले.
कोर्टाने दोन गोष्टी याआधीच स्पष्ट केल्या आहेत. एक म्हणजे ५० टक्क्यांच्यावर आरक्षण नाही, आणि दुसरे तुम्हाला कुणाला आरक्षण द्यायचे असेल, तर ओबीसी कमिशनमार्फत द्या असे म्हटले आहे. या सरकारनं तर कमिशनलाच आव्हान दिलं आहे. कोर्ट म्हणते आहे की मग आम्ही ज्या व्यवस्था निर्माण केल्या त्यालाच तुम्ही आव्हान देणार असाल तर ते ढोंगी आहेत, असे आंबेडकर म्हणाले. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला हवे, याच मताचे आम्ही आहोत.
मात्र, त्यांनी श्रीमंत मराठ्यांच्या कोशातून बाहेर पडावं. गरीब मराठ्याची वागणूक बघितली तर तो आजही श्रीमंत मराठ्याच्याच पाठीमागे आहे. आरक्षण की जात असे जर आले तर तो जात पकडतो, तो आरक्षण पकडतच नाही. गरीब मराठा तरुणांचे भवितव्यच अंधारात टाकले आहे. पण या गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांना आमचं भविष्य अंधारात का टाकलं हे विचारायला पाहिजे. गरीब मराठा तरुणांच्या आयुष्यात ज्या श्रीमंत मराठ्यांमुळे अंधार पसरला आहे, आमचा रस्ता का बंद केला म्हणून गरीब मराठा तरुणांनी श्रीमंत मराठ्यांचे राजीनामे मागितले पाहिजेत, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
आता गरीब मराठा तरुण काय भूमिका घेतात, हे बघितले पाहिजे. श्रीमंत मराठ्यांच्या कोशातून बाहेर पडून गरीब मराठ्यांनी आरक्षणाच्या बाजूने असलेल्या पक्षांसोबत राहिले पाहिजे. तसेच ज्या श्रीमंत मराठ्यांनी त्यांना फसवले आहे, त्यांचे राजीनामे मागून आपले अस्तित्व दाखवले पाहिजे, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App