मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतरही प्रत्युत्तरे थांबेनात…!! अशी अवस्था महाराष्ट्रात दिसते आहे. इतकेच नव्हे तर बाकीच्या नेत्यांचे सोडून द्या, पण ज्या शरद पवारांनी राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांच्याकडे फारसे लक्ष देऊ नका, असे सांगितले होते, ते स्वतःच राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतर 22 मिनिटे पत्रकार परिषदेत बोलले. विषय सगळे राज ठाकरे यांच्या उत्तर सभेतल्या मुद्द्यांवर प्रत्युत्तरे देण्याचेच होते…!! शरद पवारांच्या बाबतीत जे घडले, तेच थोड्या फार फरकाने राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांच्या बाबतीत घडलेले दिसले. शिवसेनेच्या वतीने फक्त संजय बोलले पण राष्ट्रवादीचे एकापाठोपाठ एक नेते राज ठाकरेंवर प्रतिक्रिया व्यक्त करायला बाहेर पडले. ज्यांच्याकडे अजिबात लक्ष देण्याची आवश्यकता नाही, असे राष्ट्रवादीचे नेते म्हणाले त्या राज ठाकरे यांच्यावर सर्वाधिक प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी व्यक्त केल्या…!!MNS chief Raj Thackeray’s reply will not stop even after the meeting
– जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्युत्तर
राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन-चार वाक्यांत टीकास्त्र सोडले होते. पण जितेंद्र आव्हाड यांनी भाषणा पाठोपाठ भाषणे करून राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांचा रोख अर्थातच बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या शिवचरित्रावर आणि राज ठाकरे यांनी बाबासाहेबांच्या केलेल्या समर्थनावर आहे. राज ठाकरे यांनी बाबासाहेबांचे समर्थन काही पहिल्यांदाच केलेले नाही, त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड यांनी देखील बाबासाहेबांवर शरसंधान काही पहिल्यांदाच केलेले नाही. त्यामुळे राज ठाकरे आव्हाड यांचे बाबासाहेब समर्थनाचे मुद्दे आणि बाबासाहेब विरोधाचे मुद्दे मुद्दे दोन्हीकडे समान आहेत… फक्त फरक एवढा होता, की राज ठाकरे जितेंद्र आव्हाडांना “नागाचा फणा” म्हणाले, तर जितेंद्र आव्हाड राज ठाकरे यांना “कोंबडीचा एक भाग” म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना मिमिक्री आर्टिस्ट असे नामाभिधान दिले. पण स्वतः आव्हाडांनी “कोंबडीचा भाग” म्हणून त्याच मिमिक्री आर्टिस्टची पुढची भूमिका पार पाडली…!!
– सुप्रिया सुळे यांचे प्रत्युत्तर
सुप्रिया सुळे यांनी देखील करमणुकीचा थोडा मसाला त्यांचा हक्क बनतो, असे सांगून राज ठाकरे गंभीर कसे नाहीत… महागाई – बेरोजगारी सारख्या गंभीर मुद्द्यांवर त्यांनी भाषण कसे केले नाही…, याचेच वर्णन केले. पण प्रतिक्रियेच्या सुरुवातीला त्यांच्याकडे फारसे लक्ष द्यायला नको असे सांगायलाही सुप्रियासुळे विसरले नव्हत्या.
– बालमोहनला परत ऍडमिशन
जयंत पाटलांना राज ठाकरे “जंत पाटील” म्हणाले. त्यावरूनच जयंत पाटलांनी बालमोहन विद्यालयाला राज ठाकरेंना पुन्हा व्याकरणाच्या वर्गात ऍडमिशन देण्याची सूचना केली. यातला इंटरेस्टिंग भाग असा की राज ठाकरे आणि जयंत पाटील दोघेही एकाच बालमोहन विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. अर्थात वेगवेगळ्या बॅचचे…!!
संजय राऊत यांनी भाजपचा भोंगा… अशीच जुनी प्रतिक्रिया व्यक्त करून आणखी दोन चार वाक्ये बोलून विषय संपवण्याचा प्रयत्न केला.
– काल – आज – उद्या पोस्टर्स!!
पण आता मुंबईत राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल मोठी पोस्टर्स लागली आहेत. राज ठाकरे यांचा मुसलमानी टोपी घातलेला फोटो – भगव्या शालीत लपेलेला फोटो आणि पुढच्या चौकटीत प्रश्नचिन्ह असे काल – आज आणि उद्या पोस्टर्स मुंबईत झळकताना दिसत आहेत. अर्थातच नेहमीप्रमाणे ही पोस्टर्स चिकटवलेल्या माणसांची नावे त्यावर नाहीत. त्यामुळे राज ठाकरे विरोधकांचेचे काम आहे हे नक्की!! पण ते नेमके कोण आहेत…??, हे मात्र सार्वजनिकरित्या अज्ञात आहे…!! (म्हणजे खासगीत सगळ्यांना माहिती आहे.)
ज्या राज ठाकरे यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असे शरद पवारांपासून सगळेच नेते म्हणतात, त्या राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतरही प्रतिक्रिया व्यक्त करायला पोस्टर्स लावायला हे नेते आणि याच नेत्यांची माणसे पुढे आलेली दिसतात…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App