विशेष प्रतिनिधी
नाशिक – महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दोन महत्त्वाच्या घटक पक्षांमध्ये कमालीची धास्ती दिसून येत आहे. विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन वगैरे ठीक आहे. पण त्या पेक्षाही महत्त्वाच्या घडामोडींमुळे महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष धास्तावले आहेत. Major political unrest in NCP and shiv sena ahead of two days maharashtra legistature session
राष्ट्रवादीमागे ईडीच्या तपासाची आणि चौकशीची कटकट लागली आहे, तर शिवसेनेत संघटनात्मक पातळीवर खदखद दिसत आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या जप्ती ही ईडीच्या कारवाईची सुरूवात आहे, असे मानले जात आहे. इथून पुढे ईडीच्या कारवाईच्या तारा राज्य शिखर बँक घोटाळा, सहकारी साखर कारखाने विक्री घोटाळा या प्रकरणांपर्यंत जाऊन त्या पवार परिवारापर्यंत पोहोचण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या आजच्या पुण्यातल्या वक्तव्यातून ही बाब स्पष्ट होते आहे. जरंडेश्वर कारखान्याची जप्ती हे हिमनगाचे टोक आहे. अजून यादी बरीच मोठी आहे, असे ते म्हणाले आहेत.
याचिकाकर्ते माणिकराव पाटील यांनी तर कारखाने विक्री घोटाळ्याची जंत्रीच पत्रकारांना वाचून दाखविली आहे. यात संपूर्ण पवार परिवार गुंतल्याचे पुरावे कोर्टापर्यंत पोहोचल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पवार परिवारासह राष्ट्रवादीला भोगायला लागू शकतो. किंवा त्यांना केंद्रीय सत्तेशी जुळवून घ्यावे लागू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
जे राष्ट्रवादीचे तेच शिवसेनेचे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याच विरोधात एकप्रकारे शिवसेना आमदारांच्या तक्रारी आहेत. ठाण्यातले प्रताप सरनाईक, पुणे जिल्ह्यातले विजय शिवतारे, शिवडीचे अजय चौधरी आणि आता उत्तर महाराष्ट्रातून चिमणराव पाटील या शिवसेना आमदारांची खदखद त्यांनीच लिहिलेल्या पत्रांमधून बाहेर आली आहे किंवा त्यांन जाहीर प्रेस कॉन्फरन्समधून बाहेर आणली आहे. प्रताप सरनाईकांनी ईडीचा ससेमिरा चुकविण्यासाठी भाजपशी जुळवून घेण्याची मागणी केली आहे. विजय शिवतारे यांनी काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. तर अजय चौधरी यांनी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाडांचा टाटा हॉस्पिटलला म्हाडाच्या सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना फिरवायला लावला आहे. चिमणराव पाटलांनी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
एकटे संजय राऊत शिवसेनेचा किल्ला एकजूट ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण त्यांचे प्रयत्न तोक़डे पडतानाही दिसत आहेत.
राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या बाबतीत विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर या अस्वस्थ करणाऱ्या घटना घ़डत आहेत. हा नक्कीच नुसता योगायोग नाही, तर राजकीय योगायोग असल्याचे मानण्यात येत आहे.
या राजकीय योगायोगाचे परिणाम दोन दिवसांच्या अधिवेशनात दिसतात की त्यानंतर लगेच दिसतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App