नाशिक : देशाचे नेतृत्व मराठी माणसाने करावे हे अनेक मराठीजनांचे स्वप्न आहे. त्याविषयी अनेकदा राजकारणी बोलत असतात. परंतु, देशातील अग्रगण्य उद्योजक म्हणून राहुल बजाज यांनी याबाबत व्यक्त केलेली खंत अधिक मोलाची ठरते…!!Sharad Pawar could not become Prime Minister; Rahul Bajaj was sad
17 ऑक्टोबर 2015 रोजी बारामतीतील कृषी विज्ञान महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी राहुल बजाज यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविषयी गौरवोद्गार काढले होते. “शरद पवार हे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान आहेत”, असे ते म्हणाले होते. शरद पवारांकडे विकासाची विशाल दृष्टी आहे. जागतिक परिस्थितीची त्यांना उत्तम जाण आणि भान आहे, अशा शब्दांमध्ये राहुल बजाज यांनी शरद पवारांच्या नेतृत्व गुणांचे वर्णन केले होते.
शरद पवार आणि राहुल बजाज यांची मैत्री 1960 च्या दशकात पासूनची होती. राहुल बजाज यांनी बजाज ऑटो कंपनीची सूत्रे हाती घेतली, तेव्हा शरद पवार नुकतेच आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले होते. 1967 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आधी सायकलवरून प्रचार आणि नंतर स्कूटरवरून प्रचार करण्यासंदर्भातील आठवण त्यांनी सांगितली होती. ही छोटी स्कूटर बजाजची होती.
त्यानंतर शरद पवारांची राहुल बजाज यांच्याशी मैत्री वाढतच गेली. महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण ठरविण्यात राहुल बजाज यांनी मोलाची भूमिका बजावली. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसराचा विकास करण्यात जे अनेक उद्योजक पुढे आले, त्यामध्ये राहुल बजाज अग्रगण्य होते. याच काळात शरद पवारांचे नेतृत्व महाराष्ट्रात फुलत होते. 1978 मध्ये ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांची राजकीय वाटचाल महाराष्ट्रात आणि देशात सुरू झाली. या काळात त्यांची राहुल बजाज, नीळकंठ कल्याणी, बाबा कल्याणी, बी. जी. शिर्के या उद्योजकांशी कायम मैत्रीपूर्ण संबंध राहिले.
देशात लायसन्स राज आणि लालफितशाही घट्ट असताना, उत्पादन क्षेत्रात लुडबूड करणे हे सरकारचे काम नव्हे, असे मत शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले होते. यामागची प्रेरणा राहुल बजाज यांची होती असे त्या वेळी बोलले गेले होते. महाराष्ट्रात वाहन उद्योग क्षेत्रासाठी विशेष सवलती शरद पवारांनी आपल्या राजवटीत जाहीर केल्या होत्या.
याचाच लाभ बजाज आणि फिरोदिया या उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर झाला. हा 1990 च्या दशकातला इतिहास आहे. असेच खुले औद्योगिक धोरण देशाच्या अन्य भागात अमलात आणले असते, तर वाहन उद्योग क्षेत्रात देशाने आणखी मोठी झेप घेतली असती, असे मत राहुल बजाज यांनी व्यक्त केले होते आणि त्यातूनच त्यांनी शरद पवार हे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान आहेत असे गौरवोद्गार काढले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App