वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एप्रिल 2020 मध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली होती. या मॉब लिंचिंगचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीवर बुधवारी (29 मार्च) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असली तरी अद्याप पीडित साधू व चालकाला न्याय मिळालेला नाही.Palghar Sadhu Mob Lynching Case Supreme Court Updates
या हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडून करण्यात आली होती, मात्र तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय तपासाला विरोध केला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर, गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये भाजप-शिंदे सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले, ज्यामध्ये त्यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचे मान्य केले.
काय आहे प्रकरण?
16 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्रातील पालघरमधील गडचिंचाळे गावात 500 हून अधिक लोकांच्या जमावाने दोन साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या केली. त्यानंतर 21 एप्रिल 2020 रोजी हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, बालकांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याच्या अफवेमुळे साधूंची हत्या झाली. या टोळीतील सदस्य संत, डॉक्टर, पोलिस यांची वेशभूषा परिधान करून परिसरात लहान मुलांची चोरी करत असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे चालक आणि दोन्ही साधूंना जमावाने क्रूरपणे ठार केले होते.
सुरतमधील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी तिघे कारमधून जात असताना ही हत्या झाली. पालघरमधील या घटनेबाबत कासा पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. या घटनेनंतर अवघ्या देशात खळबळ उडाली होती, त्यानंतर राज्य सरकारने काही पोलिसांना निलंबित केले होते. यासोबतच सरकारने 35 हून अधिक पोलीस हवालदार आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्याही केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App