कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतून मोठ्या परिश्रमाने देश सावरत आहे. अशावेळी पुन्हा परीक्षेच्या निमित्ताने देशभरच्या तरुणाईला एकत्र आणून कोरोना संसर्गाचा धोका निर्माण करण्याची गरज नाही. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची बारावी परीक्षा रद्द करण्याचा ठाम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 1) घेतला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा उडालेला गोंधळ उद्धव ठाकरे-अजित पवार यांचे सरकार कधी दूर करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. CBSE’s 12th exam canceled : Modi took the decision, when will Uddhav Thackeray?
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेनेही (सीआयएससीई) बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.
हा निर्णय घेण्यापुर्वी पंतप्रधान कार्यालयाने सर्व राज्ये, विविध शैक्षणिक संस्था, मुख्याध्यापक आणि शिक्षण तज्ज्ञ आदींशी व्यापक चर्चा केली. कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत कोणत्या पद्धतीने परीक्षा घ्यावी,
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय करता येईल या संबंधीच्या संभाव्य पर्यायांची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली. मात्र यातील अनिश्चितता आणि अचानक संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेऊन मोदी यांनी यंदा बारावी बोर्ड परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला.
आता निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या बारावीचा निकाल तयार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम ठरवण्याची सूचना सीबीएसईला करण्यात आली आहे.
मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य मंत्री पियूष गोयल, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे पर्यायी मूल्यांकन कोणत्या निकषा आधारे करायचे याचा निर्णय सीबीएसईने घेतलेला नाही. सूत्रांनी सांगितले की, दहावीच्या परीक्षेबाबत जसा निर्णय झाला त्याच धर्तीवर बारावीच्या परीक्षेचाही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे तर त्यांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने परीक्षे देण्याची सोय उपलब्ध करुन द्यावी, असेही ठरले आहे. अर्थात कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर अनुकूल वेळेची वाट या परीक्षेसाठी पाहावी लागेल.
दरम्यान, सीबीएसई आणि सीआयएससीई या दोन्हीही राष्ट्रीय बोर्डांनी बारावी परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर केली आहे. याच पद्धतीने महाराष्ट्राचा शिक्षण विभाग कधी निर्णय घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेही परीक्षा रद्द करावी असा जोरदार मतप्रवाह आहे. ठाकरे-पवार सरकारची कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठक बुधवारी (दि. 2) आहे. या बैठकीत ठाकरे-पवार सरकार पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाचे अनुकरण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App