विशेष प्रतिनिधी
वाराणसी : “पाकिस्तानने ज्या महिलांचा अपमान केला, त्याच महिलांना पुढे आणून आम्ही त्यांना आणि जगाला दाखवून दिलं की, भारतातील महिलांची ताकद काय आहे. त्या कोणाच्याही कमी नाहीत,” अशा शब्दांत प्रसिद्ध कवी आणि विचारवंत डॉ. कुमार विश्वास यांनी पाकिस्तानला खरमरीत उत्तर दिले. Dr. Kumar Vishwas
राष्ट्रीय महिला आयोग आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने वाराणसी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. देशभरातून महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या मान्यवर वक्त्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर होत्या.
डॉ. कुमार विश्वास आपल्या भाषणात म्हणाले की, “भारत हा वेदांचा देश आहे. येथे पूजेची सुरुवातही आईपासून होते. तरीही भारतावर महिलाविरोधी असल्याचे आरोप होतात, हे दुर्दैवी आहे. आमच्या संस्कृतीत हजारो वर्षांपासून स्त्रीला देवी मानलं गेलं आहे. भारतात नारीला केवळ पूजनीय मानलं गेलं नाही, तर निर्णयक्षमतेच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. अहिल्याबाई होळकर हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहेत.”
कुमार विश्वास म्हणाले, आजच्या काळात अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अहिल्याबाईंच्या कार्याबद्दल माहितीच नाही. त्यामुळे त्यांच्या कार्याचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. त्यांनी फक्त एक आदर्श प्रशासक म्हणून नव्हे, तर एक श्रद्धेय समाज सुधारक, धार्मिक नेता आणि स्त्री सक्षमीकरणाची अग्रदूत म्हणून कार्य केलं आहे.”
त्यांनी एका ऐतिहासिक प्रसंगाचा उल्लेख करत सांगितले की, “एकदा सीमेलगतच्या भागात एका सैन्याने आक्रमण केले होते. तेव्हा अहिल्याबाईंनी स्पष्ट शब्दांत संदेश दिला की, ‘मी स्वतः हत्तीवरून येत आहे आणि माझ्या मैत्रिणी घोडीवरून येत आहेत. जर आम्ही तुम्हाला पराभूत केलं तर हा तुमच्यासाठी मोठा अपमान ठरेल.’ असा धाडसी दृष्टिकोन फक्त स्त्रीतच असतो.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात विजया रहाटकर म्हणाल्या, “अहिल्यादेवींचं जीवन म्हणजे नारीशक्तीच्या उत्कर्षाचं प्रतीक आहे. त्यांनी केवळ राज्यकारभारात प्रजाजनांप्रती न्याय केला नाही, तर घाट, मंदिरे, धर्मशाळा, पाणीवाटप व्यवस्था अशा लोकहिताच्या योजना कार्यरत करून सामाजिक पुनर्रचनेचं अद्वितीय उदाहरण ठेवले. आजच्या महिला त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात नवी दिशा देऊ शकतात.”
या कार्यक्रमात देशभरातून महिलांच्या सशक्तीकरणासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले. अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्रप्रदर्शन आणि कथाकथन सत्राचेही आयोजन करण्यात आले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App