विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : S. Jaishankar संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 80 व्या अधिवेशनात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला दहशतवादाचे आश्रयस्थान ठरवत त्यावर जोरदार प्रहार केला. त्यांनी नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधत म्हटले की, “भारताने स्वातंत्र्यापासून दहशतवादाचा सामना केला आहे. आमचा शेजारी देश आजही जागतिक दहशतवादाचे केंद्र बनला आहे.”S. Jaishankar
जयशंकर म्हणाले की, गेल्या अनेक दशकांतील आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ल्यांचा मागोवा घेतला तर त्यांचा संबंध त्या एकाच देशाशी आढळतो. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी यादीतही त्याच देशातील नागरिकांचा मोठा भरणा आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे एप्रिल महिन्यात पहलगाव येथे पर्यटकांची निर्घृण हत्या. भारताने तेव्हा आपल्या नागरिकांचे रक्षण करण्याचा हक्क बजावत हल्ल्याचे सूत्रधार व गुन्हेगारांना न्यायालयात उभे केले.S. Jaishankar
परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले की, दहशतवाद ही केवळ भारताची समस्या नाही तर संपूर्ण जगासाठीचा धोका आहे. “जेव्हा एखादा देश उघडपणे दहशतवादाला राज्यनीती म्हणून स्वीकारतो, जेव्हा दहशतवादी कारखाने उघडपणे चालवले जातात, जेव्हा दहशतवाद्यांचा गौरव केला जातो, तेव्हा त्याचा सार्वत्रिक निषेध झाला पाहिजे,” असे ते म्हणाले. त्यांनी यावर भर दिला की दहशतवादाला वित्तपुरवठा करणारे मार्ग तातडीने रोखले पाहिजेत, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढले पाहिजे आणि संपूर्ण दहशतवादी जाळ्यावर सातत्याने दबाव ठेवला गेला पाहिजे.
पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याबरोबरच जयशंकरांनी अमेरिका व चीनच्या अन्यायकारक व्यापार धोरणांवरही टीका केली. “मनमानी टॅरिफ बदल, तंत्रज्ञानावर निर्बंध आणि पुरवठा साखळीवर दबाव या पद्धतींनी जागतिक व्यापार अस्थिर झाला आहे. परिणामी, बाजारपेठेतील अस्थिरता, अनिश्चित प्रवेश आणि मर्यादित स्रोतांवर अवलंबित्व वाढले आहे. आता प्रत्येक देशाला धोके कमी करण्यासाठी नवे पर्याय शोधणे भाग पडले आहे,” असे त्यांनी सांगितले.
भारताच्या भूमिकेबाबत जयशंकर ठामपणे म्हणाले की, “जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश, एक प्राचीन संस्कृतीचे राष्ट्र आणि जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताला स्वतःची ओळख ठाऊक आहे. भारत नेहमी स्वतंत्र निर्णय घेईल आणि ग्लोबल साऊथमधील आवाज ठरेल.”
संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून जयशंकर यांनी दिलेला हा ठाम संदेश भारताच्या कणखर परराष्ट्र धोरणाची झलक दाखवणारा ठरला. एका बाजूला पाकिस्तानला उघड आव्हान देताना त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे राहण्याचे आवाहन केले, तर दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि चीनलाही स्पष्ट इशारा देत भारताच्या स्वायत्त भूमिकेची घोषणा केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App