विनायक ढेरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे गेल्या साधारण दीड – दोन वर्षांपासून आपल्या टीकेचे लक्ष प्रादेशिक पक्षांची घराणेशाही असे ठेवले आहे. राष्ट्रीय पातळीवर तर काँग्रेसच्या घराणेशाहीवर या तीनही नेत्यांनी आपल्या सर्वच्या सर्व राजकीय जीवनात कायमच शरसंधान साधले आहे आणि त्यात गैरही काही नाही. कारण या तीनही नेत्यांचे “राजकीय ग्रुमिंग” भाजप सारख्या निदान सर्वोच्च पातळीवर असलेल्या बिगर घराणेशाही पक्षातून झाले आहे. Political Dynasty : 3 ministers and 3 MPs, BJP’s top leadership’s dilemma
– प्रादेशिक घराणेशाहीवर शरसंधान
… आणि जेव्हा काँग्रेस पक्षातील घराणेशाही देशपातळीवर संपूर्णपणे निष्प्रभ ठरली आहे, तेव्हा या तीनही नेत्यांनी प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीवर कॉन्सन्ट्रेट करून प्रहार करणे यामागे तर 100 % टक्के “पॉलिटिकल लॉजिक” आहे. पण प्रादेशिक आणि एकूणच राजकीय घराणेशाहीचे आव्हान भाजपलाही पेलणे सोपे नाही. हे आजच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारातून स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्राच्या शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप युतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात असे 3 मंत्री आहेत की ज्यांची मुले खासदार आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले विजयकुमार गावित यांची मुलगी डॉ. हिना गावित खासदार आहे, तर काँग्रेस – शिवसेना पुन्हा काँग्रेस आणि आता भाजप असा राजकीय प्रवास केलेले राधाकृष्ण विखे पाटील या ज्येष्ठ मंत्र्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील हे देखील खासदार आहेत. याचा अर्थ भाजप देखील मंत्रिमंडळ विस्तारात घराणेशाहीच्या सावलीच्या फारसा बाहेर पडू शकलेला नाही, हेच आज स्पष्ट होते.
भाजपच्या इनकमिंग मधील घराणेशाही
अर्थात याच्या शेड्स वेगवेगळ्या आहेत. एकनाथ शिंदे हे मूळातच भाजपचे नाहीत, असे भाजपचे नेते म्हणू शकतात आणि ते खरेही आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा खासदार हा राजकीय युक्तिवाद त्यांच्यासाठी लागू होत नाही. पण 4 पक्षांचा प्रवास करून भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले विजयकुमार गावित यांची पाळेमुळे भाजप अथवा संघ परिवारात नाहीत, तर त्यांच्या घराणेशाहीची पाळेमुळे आपापल्या काँग्रेसचे विचारसरणीच्या राजकीय पक्षांमध्ये आहेत, असे भाजपचे नेते म्हणू शकतात. त्यातही जरूर तथ्य आहे, पण प्रश्न त्याही पलिकडचा आहे मग जर राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयकुमार गावित हे जर मूळच्या काँग्रेसचे विचारसरणीच्या पक्षाचे आहेत आणि त्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले आहेत, तर त्यांची घराणेशाही भाजपच्या नेत्यांना टाळता का नाही आली??… अशी कोणती राजकीय मजबुरी आहे की ज्यामुळे ही उपप्रादेशिक घराणेशाही भाजपच्या नेत्यांना सहन करावी लागते आहे?? या प्रश्नाचे उत्तर मिळणे आवश्यक आहे. ते अर्थातच उपप्रादेशिक राजकारणाच्या मायक्रो लेव्हलला मिळू शकते. केंद्रीय पातळीवर पूर्ण बहुमतानिशी 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर भाजपचा सामाजिक विस्तार खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. पण तो सामाजिक विस्तार एवढाही पूर्ण झालेला नाही, की भाजप खऱ्या अर्थाने भारतव्यापी पक्ष ठरू शकेल आणि तिथेच भाजपच्या नेत्यांना काही प्रमाणात राजकीय तडजोड करावी लागत आहे. ही सध्याची भाजपची राजकीय अपरिहार्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App