विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : म्हणे, पाकिस्तानी पंतप्रधानांना उपरती झाली आणि त्यांनी पाकिस्तानला भारताशी युद्ध केल्याचा धडा मिळाल्याचे वक्तव्य केले. युद्धातून आम्ही शिकलो आणि आम्ही आता भारताशी शांततेचे संबंध प्रस्थापित करू इच्छितो, असे सांगितले. पण वास्तविक ही मुलाखत नीट ऐकली तर युद्धाचा धडा मिळाल्याचे एक वक्तव्य सोडताच, बाकी सगळे वक्तव्य हे पाकिस्तानची जुनीच काश्मीर विषयक कुरापतखोर भूमिका उगाळणारे ठरल्याचे दिसून येत आहे. Pakistan Prime Minister says that lesson learned from war with India
पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. पाकिस्तान सध्या आर्थिक गर्तेत आहे. तिथे लोकांना अन्नाला मोताद झाले आहेत. त्यामुळे सौदी अरेबिया कडे आर्थिक मदतीसाठी हात पसरण्याशिवाय पाकिस्तान पुढे पर्याय नसल्याने पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी सौदीकडे आर्थिक मदत मागितली आणि त्याचवेळी सौदी राज्यकर्त्यांना काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करण्यासाठी देखील आवाहन केले. हेच त्यांनी अल अरेबिया न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
मराठी माध्यमांची एकतर्फी बातमी
पण मराठी माध्यमांनी मात्र त्यातला एकच मुद्दा उचलून पाकिस्तानी पंतप्रधानांना उपरती झाल्याच्या बातम्या दिल्या आहेत. पाकिस्तानने भारताशी तीन युद्धे केली. पण आम्हाला त्यातून फक्त गरिबी आणि बेरोजगारी मिळाली. आमच्या जगण्याचा स्तर आम्ही हरवून बसलो. पाकिस्तानची आर्थिक हालत खस्ता झाली. आम्ही त्या युद्धाचा धडा चांगलाच शिकलो आहोत आणि आम्हाला आता भारताशी शांततेचे संबंध हवे आहेत, असे वक्तव्य शहाबाज शरीफ यांनी या मुलाखतीत जरूर केले यात शंका नाही. पण हा मुलाखतीतला अर्धाच भाग होता.
https://www.youtube.com/watch?v=M3vFEJmbrps
खोडसाळ प्रचारकी भूमिकाच कायम
त्यानंतर पंतप्रधान मोदींना तुम्ही काय संदेश द्याल??, असा अँकरनी विचारलेल्या प्रश्नावर मात्र शहाबाज शरीफ पुन्हा पाकिस्तानच्या मूळ अडेलतट्टू भूमिकेवरच आलेले दिसले. भारताने काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन चालवले आहे ते त्यांनी बंद करावे. काश्मीरमध्ये जी काही स्वायत्तता 370 कलमामुळे दिली होती, ती ऑगस्ट 2019 मध्ये संपुष्टात आणली. 370 कलम भारत सरकारने हटवले. ते त्यांनी पुनर्स्थापित करावे. भारतातल्या अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत, ते बंद करावेत, अशी एकापाठोपाठ एक खोडसाळ प्रचारकी वक्तव्ये करून शहाबाज शरीफ यांनी पाकिस्तानची मूळ भारत विरोधीच भूमिका साखरेत घोळलेल्या उच्चशिक्षित इंग्लिश मध्ये मांडली.
अर्धवट मुलाखतीवर आधारित बातमी
त्यामुळे पाकिस्तानी पंतप्रधानांना उपरती झाल्याच्या ज्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत, त्या केवळ अर्धवट मुलाखतीवर आधारित असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानच्या भारताविषयीच्या मूळ भूमिकेत तसू मात्र हे बदल झालेला नसल्याचे खरे म्हणजे या मुलाखतीतूनच स्पष्ट होते. परंतु, त्यातला अर्धाच भाग उचलून मराठी माध्यमांनी प्रसिद्ध केल्याचे दिसत आहे.
काश्मीरमध्ये हस्तक्षेपाचे सौदी राज्यकर्त्यांना आवाहन
इतकेच नाही, तर शहाबाज शरीफ यांनी सौदी राज्यकर्त्यांना काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करण्याचे देखील आवाहन केले आहे. सौदीचे पाकिस्तानशी तर बंधुत्वाचे संबंध आहेत, पण भारताशी देखील मैत्री संबंध आहेत. त्यामुळे सौदी राज्यकर्ते दोन्ही देशांना एकत्र आणण्यात फार मोठी भूमिका बजावू शकतात. ते त्यांनी जरूर करावे. पाकिस्तानच्या वतीने मी त्यांना शब्द दिला आहे की आम्ही त्यांचे ऐकू, असे वक्तव्य शहाबाज शरीफ यांनी मुलाखतीत केले आहे. हे काश्मीर प्रश्नात तिसऱ्या पक्षाने नाक खूपसण्यासाठी केलेले आवाहन आहे. काश्मीर प्रश्न द्विपक्षीय असल्याचे शिमला करारात स्वीकारण्यात आलेले सत्य आहे. पण त्या सत्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून पाकिस्तानी पंतप्रधानांनी सौदी राज्यकर्त्यांना काश्मीर प्रश्नात लक्ष घालायला सांगितले आहे. या महत्त्वाच्या मुद्द्याकडे देखील मराठी माध्यमांचे दुर्लक्ष झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App