मराठीत एक म्हण आहे, “पाचामुखी परमेश्वर”. म्हणजे पाच मुखांनी एकच गोष्ट कोणी बोलत असेल तर तो आवाज परमेश्वराचा मानावा. असे मानले जाते आणि त्या आवाजानुसार आपण अनुसरण करावे. काम करावे, असे म्हटले जाते. पण याच पाचामुखी परमेश्वराचे जेव्हा पाच तोंडामध्ये रूपांतर होते आणि ती तोंडे वेगवेगळ्या दिशेला बघून बोलायला लागतात तेव्हा काय होते, याचेच प्रत्यंतर सध्या पंजाब मध्ये काँग्रेस पक्ष घेतो आहे…!! Congress leaders infighting in pujab ruining its poll prospects itself
पंजाब मध्ये काँग्रेसचे चार-पाच नेते चार-पाच तोंडाने बोलायला लागल्यामुळे काँग्रेस पक्षाचा घात होत आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाला आम आदमी पार्टी, अकाली दल – बहुजन समाज पक्ष युती, भाजप – पंजाब लोक काँग्रेस – संयुक्त अकाली दल यांची आघाडी या तीन आघाड्यांवर लढायचे आहे, पण प्रत्यक्षात काँग्रेसचे अंतर्गतच लढाई एवढी मोठी होत गेली आहे की त्यातून पक्षाला सावरणे कठीण होत चालले आहे.
आधी कॅप्टन अमरिंदरसिंग हे काँग्रेस हायकमांडवर तोफा डागून पक्षातून निघून गेले. त्यांचे आणि नवज्योत सिंग सिद्धू यांचे कधी जमलेच नाही. पण कॅप्टन साहेब काँग्रेसमधून बाहेर पडले तरी काँग्रेस मधले नेतृत्वाचे भांडण मात्र थांबायला तयार नाही. कॅप्टन साहेब बाहेर पडल्यानंतर आता मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, नवज्योत सिंग सिद्धू, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड आणि काँग्रेसचे आनंदपूर साहिबचे खासदार मनीष तिवारी वेगवेगळ्या तोंडांनी बोलत आहेत.
यातल्या प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री व्हायची आहे आणि आपल्याच नेतृत्वावर काँग्रेस हायकमांड करून शिक्कामोर्तब करवून घ्यायची आहे. पण या सर्व नेत्यांचे वैशिष्ट्य असे की अनेक ठिकाणी ते एकमेकांच्या विरोधातच बोलताना दिसत नाहीत, तर ते थेट काँग्रेस हायकमांडलाच आव्हान देताना दिसतात आणि तरीही त्यांची अपेक्षा काँग्रेस हायकमांडने आपल्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करावी अशी आहे.
चरणजीत सिंग चन्नी यांना फक्त दोन आमदारांनी मते दिली होती. काँग्रेसच्या 42 आमदारांची मते मी मुख्यमंत्री व्हावा अशी होती, असे वक्तव्य सुनील जाखड यांनी केले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस हायकमांड नाही, तर पंजाब मध्ये निवडून आलेले काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्री ठरवतील, असे वक्तव्य केले आहे. काँग्रेस आमदारांच्या बाजूने मनीष तिवारी यांनी देखील मत व्यक्त केले आहे. या सर्व नेत्यांचा काँग्रेस आमदारांवर भरोसा आहे, पण हायकमांड वर भरवसा नाही असेच यातून दिसून येते आहे.
पंजाब काँग्रेस मधला तिढा असा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याभोवती घट्ट बसताना दिसत आहे. तो सुटण्याची सुतराम शक्यता नाही. वर म्हटल्याप्रमाणे काँग्रेसचे पाच नेते पाच तोंडाने बोलत असल्यामुळे हा तिढा अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. यातून काँग्रेस पक्षाला ना पंजाब मधले नेते सोडवत आहेत, ना काँग्रेस पक्षश्रेष्ठी कोणता तोडगा काढत आहेत. आणि तरी देखील पंजाबमध्ये पुन्हा एकदा पूर्ण बहुमत मिळवून सत्तेवर येण्याचा काँग्रेसच्या नेत्यांचा दावा आहे… आम आदमी पार्टीचे प्रचंड मोठे आव्हान उभे असताना काँग्रेसमधील पाच बोलभांड तोंडाची ही राजकीय गंमत सुरू आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App