नाशिक : अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर बारामती विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी कडून काँग्रेसने निवडणूक लढवायची तयारी केली. त्या तयारीला दिल्लीतून हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे काँग्रेस नावाच्या पक्ष संघटनेला बारामतीत राजकीय पुनरुज्जीवनाची संधी मिळाली आहे.
पवारांनी नेहमीच काँग्रेस पोखरली
वास्तविक शरद पवारांनी नेहमीच कुटुंबाच्या राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसचा वेगवेगळ्या पद्धतीने फक्त राजकीय वापर करून घेतला, पण काँग्रेसची संघटनात्मक पातळीवर मात्र नेहमीच परवड केली. काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर मजबूत होऊ दिले नाही. किंबहुना ते कायमच काँग्रेसला कमकुवत करत राहिले. काँग्रेसचे संघटन मजबूत झाल्यानंतर आपले राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, याची भीती शरद पवारांना कायम वाटत राहिल्याने शरद पवारांनी महाराष्ट्रासह बारामतीत काँग्रेस संघटना पोखरूनच स्वतःची राष्ट्रवादी काँग्रेस पोसली.
दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडला हे सगळे समजत नव्हते, असे नाही, पण काँग्रेस हायकमांडचा राजकीय प्राधान्यक्रमच वेगळा असल्याने हायकमांडने शरद पवारांच्या कारवायांकडे दुर्लक्ष केले. पण त्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्रासह बारामतीत काँग्रेस संघटना टप्प्याटप्प्याने कमकुवत होत गेली. बारामतीत तर काँग्रेस संघटना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अक्षरशः बटीक बनली.
बारामती ताकद दाखवायची संधी
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर काँग्रेसने काहीशी ठाम भूमिका घेऊन बारामतीची पोटनिवडणूक लढवायचे ठरविले. हा निर्णय काँग्रेसच्या नेत्यांनी जसाच्या तसाच ठेवून खरंच निवडणूक लढवली आणि त्यासाठी ताकद पणाला लावली, तर काँग्रेसला तिथे आता कदाचित विजय मिळणार नाही, पण काँग्रेसचे राजकीय अस्तित्व आणि ताकद दाखविण्याची संधी मात्र मिळाल्याशिवाय राहणार नाही.
बारामतीत पवारांचा कौटुंबिक स्वार्थ
कारण बारामतीच्या पोटनिवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कौटुंबिक कारणासाठी निवडणूक लढविणार नाही, हे खरेच, पण काहीही करून आणि कुठूनही करून बारामती पवारांकडेच राहील, मग ती मूळच्या पवारांकडे किंवा बाहेरून आलेल्या पवारांकडे राहिली तरी चालेल, हाच शरद पवारांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मुख्य स्वार्थ आहे. त्यामध्ये अन्य कुठलाही राजकीय हेतू नाही. त्यामुळे पवार बारामतीत काँग्रेसला निवडणूक लढविण्यासाठी मदत करणारच नाहीत. पण म्हणून काँग्रेसने पवारांच्या मदतीसाठी अडून राहण्यात सुद्धा काही मतलब नाही.
काँग्रेसची प्रतिमा उजळण्याची संधी
उलट काँग्रेसने पवारांची मदत घेतल्याशिवाय बारामतीतून रेटून निवडणूक लढवून दाखविली, तर काँग्रेसची एक लढवय्या पक्ष म्हणून महाराष्ट्रातली प्रतिमा जास्त उजळून निघेल आणि त्याचा दीर्घकालीन फायदा पक्ष संघटनेला होईल, असा विचार करूनच जर काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात उतरली तर काँग्रेसला गमावण्यासारखे काही नाही. उलट कमावण्यासारखे भरपूर असेल. बलाढ्य भाजपशी टक्कर घेणारा बळकट पक्ष म्हणून काँग्रेसची प्रतिमा उजळेल, हे मात्र निश्चित!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App