पुणे : काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाच्या नियुक्तीत नवा प्रयोग केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कामाचा धडाका लावला त्यांच्यापासून स्फूर्ती घेत पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी आघाडी घेतली. पुण्यामध्ये कलमाडींचे दिवस पुन्हा आणण्याची तयारी चालवली. पण ही ही तयारी करताना पुणे काँग्रेसने मात्र नव्या प्रयोगांच्या ऐवजी जुन्याच प्रयोगांना नव्याने संधी देण्याचा “प्रयोग” केला.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुण्यात विधानसभा मतदार संघनिहाय निरीक्षकांची नियुक्ती केली. यामध्ये प्रामुख्याने जुन्याच नेत्यांचा समावेश केला. बाळासाहेब शिवरकर + संतोष आरडे, (वडगाव शेरी) अविनाश बागवे, संतोष भुतडा (शिवाजीनगर), सुनील शिंदे + संदीप मोकाटे (कोथरूड), संजय बालगुडे + सतीश पवार (पर्वती) दीप्ती चवधरी + मेहबूब नदाफ (पुणे कॅन्टोन्मेंट), अभय छाजेड आणि दरेकर (कसबा), सुजित यादव + देविदास लोणकर (हडपसर) या सगळ्या नेत्यांवर संबंधित मतदारसंघांमध्ये जाऊन बैठका, मेळावे घेण्याची जबाबदारी सोपवली.
महापालिका निवडणुका काँग्रेस महाविकास आघाडीतून लढणार ते स्वतंत्र लढणार या विषयाचा निर्णय अद्याप लागायचा असतात काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर बांधणीसाठी नेत्यांना जबाबदारी देऊन पुढचे पाऊल टाकले. कारण पुण्यात काँग्रेसची स्वतःची म्हणून विशिष्ट ताकद आहे, ती स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आली आहे. सुरेश कलमाडी यांच्या काळामध्ये पुण्यात काँग्रेस जास्त मजबूत होती. एकेकाळी म्हणजे 1990 च्या दशकात सुरेश कलमाडींचे पुणे महापालिकेवर वर्चस्व होते. त्याआधी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ आणि जयंतराव टिळक यांचे महापालिका राजकारणावर वर्चस्व होते. या तिन्ही नेत्यांच्या कारकिर्दीमध्ये पुण्यात काँग्रेस पूर्ण वर्चस्व राखून होती. पुण्यातल्या त्यावेळच्या सगळ्या ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार, पुण्यात काँग्रेसचे खासदार आणि महापालिकेमध्ये देखील पूर्ण बहुमत एवढी काँग्रेस संघटना मजबूत होती.
काँग्रेस अखंड असताना आणि नंतर शरद पवारांनी काँग्रेस पासून फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर देखील पुण्यामध्ये महापालिका पातळीवर सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचेच वर्चस्व होते. शरद पवार आणि अजित पवारांनी प्रयत्न करूनही ते फारसे मोडीत काढू शकले नव्हते. सुरेश कलमाडी बोले आणि काँग्रेस हाले अशी त्यावेळी अवस्था होती. पुण्याचे सगळे राजकारण त्यावेळी कलमाडी हाऊस वरून चालत होते. “१, मोदी बाग” त्यावेळी अस्तित्वातही नव्हती.
परंतु राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या घोटाळ्यात सुरेश कलमाडींवर आरोप झाल्यानंतर त्यांची राजाकीय कारकीर्द घसरणीला लागली. त्यानंतर त्यांचे महापालिकेवरचे वर्चस्व संपुष्टात आले. दरम्यानच्या ५ – ७ वर्षांच्या काळात अजित पवारांचे वर्चस्व महापालिकेवर राहिले होते. परंतु तो काँग्रेस एवढे कधीच मजबूत नव्हते. 2014 नंतर तर भाजपने अजितदादांचे वर्चस्व संपुष्टात आणून स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले. या कालावधीत काँग्रेस विस्कळीत होत गेली, तरी स्वतःचे विशिष्ट ताकद पक्षाने गमावली नव्हती. आता महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने काँग्रेस पुन्हा संघटनात्मक बांधणी मजबूत करू पाहत असून काँग्रेसला सुरेश कलमाडी यांच्या काळातले जुने दिवस पुन्हा आणायचे स्वप्न पडू लागले आहे. यासाठी काँग्रेसचे जुनेच निष्ठावान राहिलेले नेते नव्याने पुढे सरकले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App