लवकरच ओबीसींची महाराष्ट्रभर आक्रोश यात्रा काढण्यात येणार
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्य्यावरून आक्रमक भूमिका घेतलेल्या मंत्री छगन भुजबळ यांनी आता ओबीसी समाजाला कळकळीचं आवाहन केलं आहे. ‘तमाम ओबीसी बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी गट तट सोडून सर्व ३७४ जातींनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरून शक्ती दाखवण्याची वेळ आलेली आहे.’ असं ते म्हणाले आहेत.Chhagan Bhujbal appealed to the OBC community
याचबरोबर ‘१ फेब्रुवारी २०२४ रोजी आपापल्या भागातील आमदार, खासदार किंवा तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील मागण्या सुपूर्द कराव्यात. लाखोंच्या संख्येने बाहेर पडून ही मागणी सर्वांनी मांडावी. सर्व आमदार खासदारांना ओबीसी, भटके विमुक्त हे देखील या राज्याचे नागरिक व मतदार आहेत आणि निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना त्यांचीही गरज आहे, याची जाणीव करून द्यावी.’ असं आवाहनही केलं आहे.
तसेच ‘या मसुद्यासंदर्भात १६ फेब्रुवारीपर्यंत लाखोंच्या संख्येने हरकती दाखल करण्यात येणार आहेत. ३ फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे ओबीसींचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, त्या मेळाव्याला सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. ओबीसी, भटके विमुक्त समाजात अनेक विचारवंत, लेखक, वक्ते, वकील आहेत. या सर्वांनी आपापल्या परीने या कामामध्ये आम्हाला सहकार्य करावे. वकील बांधवांनी ओबीसींवरील होणारा अन्याय न्यायालयात पटवून दिला पाहिजे.’ असं भुजबळांनी सांगितलं आहे.
याशिवाय ‘लवकरच ओबीसींची महाराष्ट्रभर आक्रोश यात्रा काढण्यात येणार आहे. त्याची सुरुवात मराठवाड्यातून करण्यात येणार आहे. त्याचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल. ओबीसी, भटके विमुक्त यांच्याबरोबरच एससी, एसटी आणि इतर सर्व समाजाने देखील या झुंडशाहीच्या संकटाला तोंड देण्यासाठी एकत्र येऊन आमच्या आंदोलनाला साथ द्यावी, असे माझे आवाहन आहे., असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App