विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्येत 22 जानेवारीला श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली त्यानंतर भाजपचे खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधींना आपापल्या मतदारसंघातून अयोध्येकडे मतदारांना घेऊन येणाऱ्या यात्रांचे नियोजन करण्याची सूचना भाजपच्या हायकमांडने दिल्याची माहिती आहे. 22 जानेवारीच्या मुख्य कार्यक्रमाचे नियोजन विश्व हिंदू परिषद करणार असून सरकारी यंत्रणांचे त्यांना साहाय्य असणार आहे. BJP organized a grand Ayodhya Yatra for the voters after rammandir inauguaration
अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. 22 जानेवारीला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि इतर काही केंद्रीय नेते वगळता इतर कोणत्याही बड्या नेत्याने, आमदार- खासदारांनी या दिवशी अयोध्येत येऊ नये. त्याऐवजी आपापल्या मतदारसंघात अयोध्येतील सोहळा साजरा करावा, अशी सूचना पक्षातून देण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघात होणाऱ्या कार्यक्रमात अधिकाधिक सामान्य लोकांना सहभागी करून घ्यावे, असेही नेत्यांना सांगण्यात आले आहे.
मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्याच्या दीड महिना आधी या भव्य धार्मिक सोहळ्याचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासूनच अयोध्येत धार्मिक कार्यक्रमांना सुुरुवात होत आहे. 22 जानेवारीच्या मुख्य सोहळ्यासाठी एक ते सव्वा लाख महंत, साधू-संतांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
अयोध्येतील कार्यक्रमाच्या नियोजनात वर्षभरापासून कार्यरत भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील साधू, महंत, संतांना २२ जानेवारीपूर्वी अयोध्येत पोहोचवण्याची जबाबदारी होती. त्यामुळे आम्हालाही अयोध्येला जाण्यास मिळणार असे आम्ही गृहीत धरले होते. पण काही दिवसांपूर्वीच असा निरोप आला की, तुम्ही फक्त साधू-संतांच्या प्रवासाची व्यवस्था करून द्यावी. पण तुम्ही किंवा भाजपच्या अन्य नेत्यांनी 22 जानेवारीला तिकडे जाण्याची गरज नाही. त्याऐवजी या दिवशी सर्व मंत्री, आमदार, खासदारांपासून ते ग्रामपंचायत सदस्यापर्यंत सर्वांनी आपापल्या शहरात, वसाहतीत, कॉलनीत, गावात आनंदोत्सव करावा. महाआरती, शंखनाद, पेढे वाटप असे आनंदोत्सवाचे स्वरूप असावे.
विश्व हिंदू परिषदेचे श्रेय
राम मंदिर आंदोलनात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. तरीही त्यांना दूर का ठेवले? या प्रश्नावर सांगण्यात आले की, हे आंदोलन सर्वात आधी विश्व हिंदू परिषदेने सुरू केले होते. विहिंपचे कार्यकर्ते गावागावांत जाऊन वातावरणनिर्मिती करत होते. दुसऱ्या टप्प्यात भाजप सहभागी झाला होता. म्हणून राम मंदिराचे श्रेय आधी विश्व हिंदू परिषदेला मिळावे तसेच हा कार्यक्रम राजकीय नसल्याचाही संदेश जावा, असा भाजपा श्रेष्ठींचा प्रयत्न आहे.
२२ जानेवारीनंतर मतदारांना घेऊन या
एकदा मुख्य सोहळा झाला की प्रत्येक राज्यातून मोठ्या संख्येने भाविकांना टप्प्याटप्प्याने अयोध्येत आणण्याची जबाबदारी भाजपचे आमदार, खासदार, मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात देशातील प्रत्येक गावातून आपापल्या सर्व समर्थक, मतदारांना अयोध्येला घेऊन या. त्याचे नियोजन आतापासून करा. प्रत्येक गटात ज्येष्ठ नागरिक, महिलांना विशेष प्राधान्य द्या, अशा सूचना भाजप श्रेष्ठींनी दिल्या आहेत..
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App