विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशाचे पंतप्रधानपद असो अथवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीच्या संख्याबळाची उणीव नेहमी सांगत असतात. आपल्या नेत्या आणि कार्यकर्त्यांना या उणिवेची जाणीव नेहमी करून देत असतात. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या पंतप्रधान पदाची आणि अजितदादा पवारांच्या मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवल्याशिवाय राहत नाहीत. याचे नेमके रहस्य काय आहे?? पवारांनी वारंवार सांगूनही कार्यकर्ते गगनचुंबी महत्त्वाकांक्षा ठेवतातच का?? हा खरा प्रश्न आहे!! Prime minister and chief ministership : NCP always has trouble with numbers, then why don’t they alter their ambitions??
पंतप्रधान पदाची जुनी महत्त्वाकांक्षा
शरद पवारांची पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा 1991 पासूनची आहे. पण राष्ट्रवादीने लोकसभेतील खासदारांचा आकडा डबल डिजीट मध्ये कधी गाठलेला नाही. अर्थात पवारांची महत्त्वाकांक्षा काँग्रेस पक्षात असल्यापासूनची आहे. अर्थातच काँग्रेस पक्षाकडे 2014 आणि 2019 ची लोकसभा निवडणूक वगळता नेहमी ट्रिपल डिजिट खासदारांची संख्या राहिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा ठेवली आणि ती बोलून दाखवली तर त्यात गैर मानता येणार नाही. पण काँग्रेसमध्ये गांधी परिवाराखेरीज फक्त पी. व्ही. नरसिंह राव यांचीच पंतप्रधान पदाची महत्त्वकांक्षा पूर्ण झाली आहे. डॉ. मनमोहन सिंग काँग्रेसचे पंतप्रधान जरूर होते. पण ती त्यांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नसून ते खऱ्या अर्थाने सोनिया गांधींनी नेमलेले एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर होते.
मर्यादा तर नेहमीच स्पष्ट
शरद पवारांचे तसे नाही. शरद पवारांनी पंतप्रधान पदाच्या विदेशी मुद्द्यावर काँग्रेस सोडली. स्वतःची राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. त्यानंतर वेगळ्या वाटेने ते आपली राजकीय वाटचाल करत आहेत आणि ते नेहमीच या राजकीय वाटचातील आपली मर्यादा स्पष्ट करत आले आहेत.
आता कोणी हवा देत नाही
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या पंतप्रधान पदाचा विषय जाहीर मेळाव्यात काढला होता. त्याआधी आणि त्यानंतर देखील पवारांनी आपल्याकडे संख्याबळ नसल्याचा स्पष्ट खुलासा केला होता. त्यानंतर पवारांच्या पंतप्रधान पदाच्या विषयाला राष्ट्रवादीतून कोणी फारशी हवा दिली नाही.
मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा
पण राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा मात्र महाराष्ट्रात स्थापनेपासूनच होत राहिली आहे. दस्तुरखुद्द अजितदादांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. गेल्याच महिन्यात लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी तर 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पद सोडून ते काँग्रेसला देणे ही राजकीय चूकशठरल्याचा ठपकाच पक्ष नेतृत्वावर ठेवला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री कोण अजितदादा की सुप्रिया सुळे??, यावर मंथन सुरू झाले. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदी सुप्रिया सुळे यांना बसवण्याची शरद पवारांची इच्छा आहे, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. पण या महत्त्वाकांक्षेत देखील संख्याबळाचा अडथळा आहे.
महत्त्वाकांक्षेला ब्रेक
आज 11 फेब्रुवारी 2023 रोजी नाशिक मुक्कामी शरद पवारांनी याच संख्याबळाची उणीव पत्रकारांची जाहीररित्या बोलून दाखवली. राष्ट्रवादीकडे संख्याबळाची उणीव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य करणे योग्य नाही, असे वक्तव्य करून शरद पवारांनी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेला ब्रेक लावल्याचे मानण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे टार्गेट मूळातच 100
आता इथे प्रश्न पडतो की, शरद पवारांना जर उघडपणे राष्ट्रवादीच्या संख्याबळाची उणीव माहिती आहे, तर राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रव्यापी अधिवेशनात विधानसभा निवडणुकीत फक्त 100 जागा जिंकण्याचे टार्गेट राष्ट्रवादी का ठेवते? महाराष्ट्र विधानसभेत 100 जागा जिंकणे हे काही बहुमत मिळवण्यासारखे नव्हे. विधानसभेत बहुमत मिळवण्याचा आकडाच मुळात 145 चा आहे. याचा अर्थ राष्ट्रवादीला स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी किमान 145 जागा सध्याच्या घड्याळ चिन्हावर निवडून आणाव्या लागतील. अशा स्थितीत राष्ट्रवादीची मूलभूत महत्त्वाकांक्षाच जर 100 जागा जिंकण्याची असेल, तर राष्ट्रवादीला केवळ आणि केवळ काँग्रेस सारख्या मित्र पक्षावर बहुमतासाठी अवलंबून राहावे लागले, तर मुख्यमंत्रीपदाच्या अटीतटी आणि अटीशर्ती या सतत सुरू राहणार आहेत.
महत्त्वाकांक्षा बोलून साध्य काय होणार?
या राजकीय वस्तुस्थितीची जाणीव झाल्यावर राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा तरी जाहीर रित्या कशी काय बोलून दाखवू शकतात??, हा प्रश्न आहे. यातून ते नेमके काय साध्य करतात?? राष्ट्रवादीतील नेतृत्व स्पर्धा कशी आणि कुठे सुरू आहे हे ते दाखवत असतात का?? की आपल्या कार्यकर्त्यांची मनोधैर्य टिकवून ठेवण्याची त्यांची ही राजकीय क्लृप्ती आहे?? काहीही असले तरी मुळात राष्ट्रवादीचे महत्त्वाकांक्षाच जिथे 100 आमदार निवडून आणण्याची आहे, तिथे राष्ट्रवादी सारख्या पक्षाने मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा बाळगणे हे राजकीयदृष्ट्या तरी कितपत व्यवहार आहे??, हा मूलभूत प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर आमच्याकडे संख्याबळ नाही, अशा रोकड्या भाषेत शरद पवारांनी दिले आहे!!… मुद्दा फक्त हे उत्तर राष्ट्रवादीचे नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वीकारण्याचा आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App