विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज 17 नोव्हेंबर 2022 बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतिदिन या स्मृतिदिनानिमित्त वाद रंगलाय आणि गदारोळ चाललाय, तो सावरकर ते बाळासाहेब गोमूत्र ते भारतरत्न या विषयावर!! गदारोळ आणि भांडण होतेय, ते हिंदुत्ववाद्यांमध्येच!! आणि हा सगळा चूड म्हणजे आग लावणारे मात्र नामानिराळे राहिलेत!! केवळ महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातले हे आजचे चित्र आहे. Hindutvawadi parties are quarrelling among themselves over the issue of veer savarkar and balasaheb Thackeray, but Congress and NCP absolve themselves
गोमूत्राचे हिंदुत्व
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. त्यांना पुन्हा एकदा माफीवीर म्हटले. या मुद्यावरून बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त राजकीय गदारोळ सुरू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना घेरण्याबरोबरच प्रामुख्याने घेरले, ते आदित्य ठाकरे यांना. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना मिठी मारायला आदित्य ठाकरे यांना लाज कशी वाटत नाही??, अशी वक्तव्ये झाल्यानंतर शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेतेही उसळले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे शिंदे गटावर आणि फडणवीसांवर शरसंधान साधले, इतकेच नाहीतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊन आदरांजली वाहिली ते स्मृतिस्थळ शिंदे तिथून निघून गेल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून शुद्ध केले. याचा अर्थ शिवसेनेच्या ठाकरे गटाला शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नाही, पण गोमूत्राचे हिंदुत्व मान्य आहे!!, असा घ्यायचा का?? हा खरा प्रश्न आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी राहुल गांधींना मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरेंचे शुद्धीकरण गोमुत्राने अंघोळ घालूनच करावे लागेल, असे सुनावले..
राऊतांचे भाजपला सवाल
इतकेच नाही तर, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त सुरू झालेला राजकीय वाद हा सावरकरांच्या भारतरत्न या विषयावर पोहोचला. संजय राऊत यांनी भाजपला सावरकरांच्या भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरून तिखट सवाल केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेली आठ वर्षे सर्वाधिकार असताना केंद्र सरकारने सावरकरांना भारतरत्न किताब का दिला नाही??, असा सवाल करून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न दिला पाहिजे, अशी मागणी केली.
भाजपला सुनावले, पण राहुल विषयी गप्प
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गोमूत्र ते सावरकरांना भारतरत्न असा खेळ हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या पक्षांमध्येच या निमित्ताने रंगला, पण ज्या राहुल गांधींनी सावरकरांवर महाराष्ट्रात येऊन शरसंधान साधले, ते मात्र या सर्व गदारोळात नामानिराळे राहिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करणारे साधे ट्विट देखील त्यांनी केले नाही. इतकेच नाही, तर उद्धव ठाकरेंनी आज भर पत्रकार परिषदेत तोच मुद्दा पुन्हा उगाळला. ज्यांच्या मातृ संघटनेचे म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्यलढ्यात काही योगदान नाही, त्यांनी सावरकरांविषयी आम्हाला शिकवू नये. सावरकरांबद्दल आम्हाला आदरच आहे. सावरकरांना भारतरत्न का दिला नाही??, असा सवाल केला, पण राहुल गांधींना सावरकरांचा तुम्ही अपमान करू नका, असे मात्र त्यांनी सांगितले नाही. भाजपवर मात्र एकापाठोपाठ एक तिखट वार करायला ते विसरले नाहीत.
पवार, सुप्रिया यांचे हिंदुत्व शब्द वगळून ट्विट
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त एकाही काँग्रेस नेत्यांनी ट्विट केलेले नाही. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जी ट्विट केली, त्यामध्ये हिंदुत्व शब्द नेमकेपणाने वगळला आणि बाकीचे वर्णन करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. याचाच अर्थ बाळासाहेब सावरकर ते बाळासाहेब, गोमूत्र ते भारतरत्न हा जो वाद रंगला आहे, तो हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या पक्षांमध्येच आणि नेत्यांमध्येच रंगला आहे!! पण ज्यांनी चूड म्हणजे आग लावली ते मात्र नामानिराळे राहिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App