विशेष प्रतिनिधी
संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज 19 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांच्या विशेष राजकीय आणि सामाजिक योगदानाबद्दल डॉक्टरेट प्रदान केली. या दीक्षांत समारंभात शरद पवारांना डॉक्टरेट देताना त्यांच्या कार्याचा जो आढावा घेतला, त्यामुळे शरद पवार भावूक झाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. ज्या विद्यापीठाच्या नामांतरामुळे सत्ता गमवावी लागली, त्या विद्यापीठाने डॉक्टरेट दिल्याचे समाधान असल्याचे वक्तव्य शरद पवारांनी केल्याच्या बातम्याही माध्यमांनी दिल्या आहेत. Did Sharad Pawar lost power due to renaming of Marathwada University??, read true history
पण शरद पवारांना 1995 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातली जी सत्ता गमवावी लागली, त्यामागे फक्त मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्दा होता का??, ही राजकीय ऐतिहासिक वस्तुस्थिती होती का??, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण साधारण 35 वर्षांपूर्वी घडलेल्या या सत्तांतरामाची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी मात्र काही वेगळेच सांगते आहे.
विद्यापीठाचे विभाजन
शरद पवारांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा किंबहुना नामविस्ताराचा निर्णय घेतला ही वस्तुस्थिती आहे. पण मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करताना विद्यापीठाचे विभाजन देखील केले आहे. यापैकी एका विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, तर दुसऱ्या विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अशी नावे दिली हा इतिहास आहे. 14 जानेवारी 1994 रोजी हा नामविस्ताराचा कार्यक्रम झाला.
नामांतराची मागणी 1974 ची
परंतु मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करण्याची मागणी मात्र फक्त त्याच वर्षी करण्यात आली असे नाही, तर त्यालाही त्यापूर्वीचा 20 वर्षांचा इतिहास आहे. 1972 मध्ये दलित पॅंथरची स्थापना झाल्यानंतर ही दलित चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात उभी राहिली. त्यातून 1974 मध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी प्रथम करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते. त्यानंतर चारच वर्षांनी शरद पवार म्हणजे 1978 मध्ये शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते. 1978 ते 1980 अशा दोन वर्षात शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मात्र 1974 ते 1980 या कालावधीत मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा अथवा नामविस्ताराचा निर्णय घेण्यात आला नव्हता.
नामांतर नव्हे, नामविस्तार
1980 मध्ये आपले सरकार बरखास्त झाल्यानंतर शरद पवार विरोधी पक्षनेते बनले. 1986 मध्ये शरद पवार आपला समाजवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून ते काँग्रेसचे नेते बनले आणि काही कालावधीतच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर शरद पवार 1990 च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळच्या शिवसेना – भाजप युतीवर मात करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. दरम्यानच्या काळात बऱ्याच घटना घडामोडी घडल्या आणि त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्ताराचा निर्णय घेतला. हा नामविस्तार होता, नामांतर नव्हते. अर्थात यामध्ये शरद पवारांचा सिंहाचा वाटा होता. कारण ते मुख्यमंत्री होते.
पण तरी देखील शरद पवारांनी 1995 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता गमावली, त्याची राजकीय पार्श्वभूमी फक्त नामांतर अथवा नामविस्ताराची एवढीच होती ही वस्तुस्थिती आहे का??, हा खरा प्रश्न आहे.
मुंबई बॉम्बस्फोट, मुंबई दंगल
1990 ते 95 हा प्रचंड धकाधकीचा काळ होता. तो राष्ट्रीय पातळीवर आणि महाराष्ट्र पातळीवर देखील होता. 1991 राजीव गांधींची हत्या, त्यानंतर शरद पवारांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा, पी. व्ही. नरसिंह राव यांची त्यांच्यावर मात, 1991 मध्ये शरद पवार नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात दोन वर्षे केंद्रीय संरक्षण मंत्री होणे असे अनेक राजकीय पदर त्याला होते. पण 1992 मध्ये बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबई बॉम्बस्फोट आणि मुंबई दंगल या अत्यंत महत्त्वाच्या आणि देश हादरवणाऱ्या घटना घडल्या आणि बरेच चित्र बदलले. महाराष्ट्रात सुधाकरराव नाईक यांचे सरकार जाऊन शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री बनले. मुंबई दंगल आणि मुंबई बॉम्बस्फोट या संदर्भात शरद पवारांवर त्या वेळच्या शिवसेना भाजपच्या युतीच्या नेत्यांनी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे सनसनाटी आरोप लावले होते.
या राजकीय पार्श्वभूमीवर दोनच वर्षांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय शरद पवारांनी घेतला होता. तो नामविस्तार करताना वर उल्लेख केल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ असे विद्यापीठाचे विभाजनही केले होते. हा झाला विद्यापीठाच्या नामांतराचा त्रोटक इतिहास आणि त्याची राजकीय पार्श्वभूमी.
गोवारी हत्याकांड
पण त्या पलिकडे जाऊन 1994 मध्ये शरद पवारांनी सत्ता गमावण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची घटना नागपुरात घडली होती आणि ती गोवारी हत्याकांडाची होती. शरद पवार मुख्यमंत्री असताना आदिवासी गोवारी समाजाने नागपुरात एक मोठा मोर्चा काढला होता आणि या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबार केल्यामुळे 114 गोवारींना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेचे संपूर्ण देशभर प्रचंड मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले होते. त्याचे राजकीय आणि सामाजिक परिणाम देखील झाले होते आणि या परिणामाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे शरद पवार यांच्या विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात अप्रियतेची मोठी लाट पसरली होती. त्याचवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रचंड क्रेझ महाराष्ट्रात आणि देशात होती. या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सत्तांतर झाले होते. महाराष्ट्रात 1995 मध्ये पहिल्यांदा खऱ्या अर्थाने काँग्रेसची सत्ता जाऊन विरोधी पक्ष म्हणून शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आली होती. फक्त नामांतर नव्हे, तर एवढ्या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सत्ता गमावली होती. हा वास्तव इतिहास आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App