पाच राज्यातील निवडणूक निकाल, वाढते इंधन दर, महाराष्ट्र मधील सादर करण्यात आलेले बजेट, महाविकास आघाडी सरकारची कामगिरी, देशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था आदी बाबत केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी माहिती दिली.
प्रतिनिधी
पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने चार राज्यात चांगला विजय मिळवला असून चार राज्यात भाजप सत्ता स्थापन करेल. या निवडणुकीच्या निकालांचा महाराष्ट्रावर सध्या काय परिणाम होईल याबाबत सांगू शकत नाही, परंतु जनतेच्या मनात भाजप आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा विजय होईल. महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार राज्यातून लवकर गेले पाहिजे. उत्तर प्रदेश, गोवा मध्ये शिवसेनेला किती मते मिळाली हे त्यांनी तपासून पाहिले पाहिजे. लोकशाहीत जनता सर्वात मोठी असते आणि महाविकास आघाडी सरकार कधी घालवायचे हे जनताच ठरवेल असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.Central Deputy Finanace Minister Bhagvat karad press conference on various issues
वाढत्या इंधन दराच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर डॉ. कराड म्हणाले, युक्रेन व रशिया यांच्यातील युद्धामुळे इंधनाची भाववाढ मोठ्या प्रमाणात होईल अशी चर्चा सध्या आहे. मात्र, केंद्र सरकार याबाबत लक्ष ठेवून आहे आणि भविष्यात जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने ग्रुप ऑफ मिनिस्टरच्या बैठकीत जनहिताचा निर्णय घेतला जाईल.
महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या बजेट बाबत ते म्हणाले, यासंदर्भात संपूर्ण बजेट मी ऐकले नाही. मात्र, थोडी माहिती घेतली आहे. त्यावरून असे दिसते की, महाराष्ट्रातले सध्याचे सरकार केवळ घोषणा करते मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन पैसे देण्यात आल्याचे सांगण्यात आले मात्र तसे दिसून येत नाही.
दिवाळीत केंद्रसरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अतिरिक्त कर कमी केले. मात्र, महाराष्ट्र सरकारने इंधनावरील दर कमी केले नाही. पुरेशा शैक्षणिक, व्यापारी सवलती ही जनतेला दिल्या गेल्या नाहीत. वीज बिल भरले नाही तर शेतकऱ्यांची वीज तोडणी मोठ्या प्रमाणात होत असून त्याबाबत शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला नाही.
राज्य सरकार जीएसटीचे 26 हजार कोटी रुपये केंद्राकडून येण्याचे सांगत आहे, मात्र या संदर्भातील निर्णय जीएसटी कौन्सिल मध्ये वित्त मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होत असतो. सर्व राज्याचे अर्थमंत्री यात सहभागी असतात आणि पैशांचे समान वाटप सर्व राज्यांना करण्यात येते.
भारताची सशक्त अर्थव्यवस्था
डॉ.भागवत कराड म्हणाले, यावर्षी देशाचे बजेट एकूण 49 लक्ष 45 हजार कोटींचे होते.त्याचप्रमाणे कॅपिटल एक्सपेंडिचर साडेसहा लाख कोटींचा आहे. यंदाच्या बजेटमध्ये देशाच्या पायाभूत सुविधा विकासासाठी आणि तंत्रज्ञानाला महत्त्व देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. डिजिटल बँकिंग आणि ग्रामीण भागात पोस्ट ऑफिस बँक सुविधा सक्षमीकरण करण्यात येत आहे.
‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत पाच लाख कोटी रुपये उद्योगांना उपलब्ध करून दिले असून त्याचा फायदा उद्योगांनी घेऊन आयात कमी करून निर्यातीवर भर द्यावा हा दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील उद्योग महत्त्वपूर्ण असून त्यांना आवश्यक जी मदत लागेल त्यासाठी केंद्रसरकार त्यांच्या पाठीशी आहे.येणाऱ्या काळात भारत एक सशक्त अर्थव्यवस्था म्हणून पुढे जाताना आपणास दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App