प्रतिनिधी
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला झालेल्या अपघातात बसने पेट घेतला आणि 26 प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणात संशय वाढला असून खरंच बसचा टायर फुटून अपघात झाला आणि बस नंतर पेटली की ड्रायव्हरला डुलकी लागली होती??, याविषयी संशय तयार झाला आहे. कारण बसचा टायर फुटून तो तुटल्याची कुठलीही निशाणी घटनास्थळावर अद्याप पोलिसांना आढळलेली नाही, अशी बातमी आयबीएन लोकमत दिली आहे.Buldhana Bus Accident : Did the bus tire burst or did the driver take a nap??; Driver Danish Ismail Shaikh in police custody!!
यासंदर्भात पोलीस चौकशी सुरू आहे. या अपघातातून ड्रायव्हर दानिश इस्माईल शेख आणि त्याचा सहकारी अरविंद जाधव हे दोघेही बचावले आहेत. या दोघांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. बस डिव्हायडरला धडकून उलटताच हे दोघे बसच्या काचा फोडून पळाले, असे बसमधून वाचलेल्या दोन प्रवाशांनीच सांगितले. पोलिसांनी ड्रायव्हर दानिश इस्माईल शेख याला ताब्यात घेतले आहे आणि त्याची पुढे चौकशी सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पंतप्रधान निधीतून 2 लाखांची मदत जाहीर केली आहे, तर मुख्यमंत्र्यांनी आधीच 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींवर बुलढाण्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून तपशीलवार माहिती
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात 26 प्रवाशांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीची ही खासगी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, हा अपघात अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. विदर्भ एक्स्प्रेस ही खासगी बस नागपूरहून निघाली होती. मी पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. यात दुर्दैवाने 26 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. जे सुखरूप आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची चौकशी होईलच
अपघात कशामुळे झाला, नेमकं काय घडलं?, याची चौकशी तर होईलच. मात्र, मी जखमींवर तातडीने उपचार करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. तशाप्रकारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रवाशांची ओळख पटवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. अपघातातील मृतांच्या कुटुंबांना सरकार 5 लाख रुपयांची मदत देईल, अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली.
नेमके काय घडले?
विदर्भ एक्सप्रेस ही खासगी प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत 26 प्रवाशांचा मृत्यू झाला.
विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई १८१९ क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि हा अपघात झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App