विशेष प्रतिनिधी
युद्धाला खऱ्या अर्थाने तोंड फुटले… ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लिटमस टेस्ट ठरले आणि महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांच्या निवडणुकीच्या युद्धाला खरे तोंड फुटले आहे… या लढाईची पहिली फेरी कालच मुंबई आणि दिल्लीत लढली गेली, ती मिंधे विरुद्ध खंदे, मालक विरुद्ध नोकर अशा शब्दांनी आणि बाळासाहेबांचे पुत्र विरुद्ध बाळासाहेबांचे पठ्ठे यांच्यात रंगली!!The fight between two Shivsena factions : will both of them sustain the power to fight their real political opponents
एकनाथ शिंदे यांनी उठाव करून सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच मातोश्री पासून लांब गेले आणि ज्या गोरेगावात पत्राचाळ आहे, त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे गोरेगाव पूर्वच्या नेस्को संकुलात शिवसेनेचा मेळावा घेते झाले. या मेळाव्यात ते एकनाथ शिंदे गटावर जोरदार बरसणार हे आधीच माहिती होते, पण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी मात्र वेगळाच समेटाचा सूर लावला. त्यामुळे काही काळ तरी उद्धव ठाकरे “यू टर्न” घेणार की काय??, अशी शंका निर्माण झाली. परंतु, उद्धव ठाकरे यांचे भाषण बघितल्यावर तसे काहीच घडले नाही.
कीर्तीकरांचे समेटाचे भाषण त्यांच्याच पुरते मर्यादित राहिले. उद्धव ठाकरेंनी मात्र नेहमीप्रमाणे शब्दांची आतषबाजी करत शिंदे गटावर जोरदार भडीमार केला. “शिंदे नव्हे, मिंधे गट”, असे नवे नामाभिधान त्यांना दिले. इतकेच नाही तर सध्या बाप पळवणाऱ्यांची टोळी महाराष्ट्रात फिरते आहे, अशा शेलक्या शब्दांमध्ये शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. त्यांचे अख्खे भाषण शिंदे गटाची गद्दारी आणि कमळाबाई यांच्या भोवतीच केंद्रित राहिले. आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. उलट ही प्रत्येकाने स्वतःची पहिली निवडणूक असे समजून मुंबईपालिका निवडणुकीत उतरा, असे आदेश देऊन त्यांनी करून लढाईचे रणशिंगच फुंकले.
मुंबईत गोरेगावात उद्धव ठाकरे हे शिंदे गटावर मिंधे गट म्हणून हल्लाबोल करत असताना तिकडे दूर राजधानी दिल्लीतून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर प्रतिहल्ला चढविला. आम्हाला नोकर समजलात तर याद राखा… आम्हाला खोके – बोके बोलता… आम्ही पण तिथे महाराष्ट्रात येऊन सगळे बोलून बाहेर काढू, असा इशारा शिंदे यांनी दिला. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आपल्या गटाचा मेळाव्याचा जो राजकीय मुहूर्त साजला होता, तोच राजकीय मुहूर्त एकनाथ शिंदे यांनी राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात साधून घेतला. महाराष्ट्र सदनात त्यांनी देशभरातल्या प्रमुख राज्यांमधल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले होते. त्यांच्यासमोर भाषण करताना शिंदे यांनी, आम्ही मिंधे तर नाहीच उलट बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत!!, अशा शब्दात ठाकरे गटावर प्रतिहल्ला केला.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या आजच्या भाषणातून मुंबईसह महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि या मध्ये शिवसेनेचे दोन गट एकमेकांवर कसे तुटून पडतील याची झलक बघायला मिळाली आहे. एकूणच महाराष्ट्राची ही लढत बाळासाहेबांचे पुत्र विरुद्ध बाळासाहेबांचे पठ्ठे अशीच रंगताना दिसणार आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या रूपाने बाळासाहेबांचे पुत्र गोरेगावच्या मैदानात उतरले होते, तर एकनाथ शिंदे यांच्या रूपाने बाळासाहेबांचे पठ्ठे आघाडीला दिसत आहेत. बाळासाहेबांच्या पुत्राबरोबर शिवसेनेचे काही नेते आवर्जून दिसत आहेत. पण राष्ट्रवादीत गेलेले छगन भुजबळ यांसारखे नेते देखील त्यांच्याबरोबर असणार आहेत.
बाळासाहेबांच्या पठ्ठ्यांमध्ये देखील एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने नारायण राणे, शिवसेनेचे 12 खासदार, 50 आमदार आणि 8 प्रांतांचे प्रमुख यांचा समावेश असणार आहे. राज ठाकरेंची मनसे देखील बाळासाहेबांच्या पठ्ठ्यांमध्ये समाविष्ट आहे… पण दोन शिवसेना जेव्हा मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये झुंजणार आहेत, त्याचवेळी इतर पक्षांची ते कशी टक्कर घेतील?? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!… आणि त्याच वेळी एकमेकांशी टक्कर घेताना शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये आपल्या खऱ्या अर्थाने राजकीय शत्रू असलेल्या पक्षांची लढण्याची ताकद तरी उरेल का?? हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे… आणि इथेच खरी बाळासाहेबांचे पुत्र विरुद्ध बाळासाहेबांचे पठ्ठे या लढाईतली “बारामती मेख” दिसणार आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App