प्रतिनिधी
रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर अतिशय नेत्रदीपक असा शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला. Shiv Rajyabhishek @350 : Experience this spectacular ceremony through the eyes of the camera!!
किल्ले रायगडावरील हा शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावलौकिकाला साजेसा असाच ठरला. यावेळी पारंपरिक पद्धतीने दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करून शिवरायांना अनेक शस्त्रास्त्रे विधिवत् प्रदान करण्यात आली. त्यानंतर लाखो शिवप्रेमींच्या साथीने शिवछत्रपतींची भक्तिभावाने आरती करून त्यांना मानाचा मुजरा करण्यात आला, आणि पालखीत बसवून शिवछत्रपतींची जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या शिवभक्तांना संबोधित करताना ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळणे हा माझा बहुमान असल्याचे सांगत, या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. महाराजांनी आपल्याला सुराज्य कसे असावे त्याची शिकवण दिली आणि आज त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन नीतीने राज्यकारभार सुरु असल्याचे यावेळी सांगितले. त्यांचे राज्य हे लोककल्याणकारी राज्य होते, तसेच सुराज्य निर्माण करण्याची संधी आम्हाला मिळाली असल्याचे यासमयी बोलताना नमूद केले. आजचा सोहळा म्हणजे रयतेच्या राजाच्या कर्तृत्वाची पूजा करण्याचा भाग्यक्षण असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
रायगड संवर्धनासाठी जसे रायगड प्राधिकरण केले त्याचप्रमाणे प्रतापगड संवर्धनासाठी प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना करण्यात येत असल्याचे याप्रसंगी जाहीर केले, तसेच त्याच्या अध्यक्षपदी खासदार उदयनराजे भोसले यांची निवड करत असल्याचेही यावेळी बोलताना जाहीर केले. रायगडाच्या पायथ्याला शिवसृष्टी उभारण्यासाठी ४५ एकर जागा राखीव असून त्याठिकाणी अत्यंत सुंदर अशी शिवसृष्टी उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा यावेळी केली.
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला असून मुंबईतील कोस्टल रोडला देखील छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा यासमयी केली. शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा, नमो शेतकरी सन्मान योजना, जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील बळीराजाला आधार दिला असून या निर्णयामागेही शिवछत्रपतींची प्रेरणा असल्याचे यावेळी सांगितले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवछत्रपतींचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार सुनील तटकरे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आणि मुख्य आयोजक भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार बच्चू कडू, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो शिवप्रेमी आवर्जून उपस्थित होते.
https://youtu.be/Mhf7mBQ9Ei4
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App