विशेष प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवायला लागली आहे, ही अतिशय चिंतेची बाब आहे असे सांगतानाच हैदराबाद गॅझेटमधील तरतुदींमुळे बंजारा समाजासारख्या इतर समाजांनाही आदिवासीत सामील होण्याची मागणी करण्यास प्रोत्साहन मिळाले असल्याचे सांगून त्यांना उचकविण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरू केली आहे. Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज नाशिकमध्ये एक दिवसाचा कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा घेण्यात आला.
शरद पवार म्हणाले की, आज केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही आणि कांदा निर्यातीवर बंधने आहेत. नाशिक जिल्हा बँक आजारी असून, शेतकऱ्यांची ही बँक प्रचंड थकबाकीत आहे. आज केंद्रात ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाहीत. त्यामुळे शेतकरी संघटना अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले. त्यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांचे कौतुक केले, कारण हा जिल्हा आधुनिक शेती आणि नवनवीन प्रयोगांसाठी ओळखला जातो. शरद जोशींच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी आंदोलनाची सुरुवात नाशिकमधूनच झाली. Sharad Pawar
देशाचा नकाशा पाहिला तर पाकिस्तान, नेपाळ अडचणीत आहेत. ज्या बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारताने मदत केली, तोही आज आपल्यासोबत नाही. श्रीलंकाही आपल्या बाजूने नाही, असे ते म्हणाले. ट्रम्प यांची निती प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्याची आहे. मोदींनी आता परराष्ट्र धोरणाबाबत अधिक विचार करण्याची गरज आहे, असे त्यांनी सुचवले.
राज्य सरकारने आरक्षणासाठी नेमलेल्या समित्यांवरही त्यांनी टीका केली. सरकारच्या कमिट्या कधीही एका समाजाच्या करायच्या नसतात, असे सांगत, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी समिती आणि मराठा समितीमध्ये केवळ एकाच समाजाचे नेते असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
शरद पवार यांनी नाशिकचा गौरवशाली इतिहास आठवून दिला. आपला पक्ष गांधी-नेहरू विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. नाशिककरांनी हा विचार स्वीकारला आहे. स्वातंत्र्यापूर्वी नाशिकमध्ये महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत वर्किंग कमिटीची बैठक झाली होती.
जवाहरलाल नेहरु यांनी भारताला सावरायचे असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बोलवायला हवे म्हणून यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलवून घेतले होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेताच, रात्री लगेच चिनने सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांना नाशिक जिल्ह्यातून खासदार म्हणून बिनविरोध पाठवले होते, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App