नाशिक : हरियाणाची एक निवडणूक काँग्रेसला बाधली त्यामुळे महाराष्ट्रात प्रतिष्ठा टिकवताना दमछाक झाली, पण हे सगळे इथेच न थांबता पुढच्या खेळीतून पाडापाडीची तयारी सुरू आहे का??, असा सवाल महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या राजकीय हालचालींमधून समोर आला आहे.
काँग्रेसने हरियाणात एकटे लढून बघितले, पण त्यांची सत्ता आली नाही. त्यामुळे “सबका साथ, सबका विकास” हे सूत्र महाविकास आघाडीला पाळावे लागेल, असे संजय राऊत यांनी आज त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेतून काँग्रेस नेत्यांना सुनावून घेतले.
त्याआधी शरद पवारांनी 85 च्या खोऱ्यात अडकवून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची राजकीय मजा घेतली, पण काँग्रेस नेत्यांनी त्यांचा “डाव” ओळखून 100 ची गुगली टाकली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आपले उमेदवार जाहीर करत आणले. आज त्यांनी 23 उमेदवारांची जाहीर यादी जाहीर केली. यातून 100 चा टप्पा गाठायचा आणि महाराष्ट्रातली प्रतिष्ठा टिकवायची, असा काँग्रेसचा इरादा आहे.
पण हे सगळे एका हरियाणातल्या निवडणुकीमुळे घडले. हरियाणात काँग्रेसला स्वबळावर सत्ता मिळवत आली नाही. भाजपची 10 वर्षांची सत्ता उलटवून टाकता आली नाही हे अपयश काँग्रेससाठी झोंबणारे ठरले. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही पक्षांना काँग्रेसवर महाराष्ट्रात कुरघोडी करायची संधी मिळाली. अन्यथा काँग्रेसने हरियाणा जिंकला असता, तर महाराष्ट्रातला अडव्हांटेज टिकवणे काँग्रेस सारख्या मुरब्बी पक्षाच्या मुरब्बी नेत्यांना अवघड नव्हते. उलट काँग्रेस नेत्यांनी ठाकरे आणि पवारांना बेमालूमपणे वाकविले असते.
Congress काँग्रेसच्या यादीत राहुल गांधींनी घातले लक्ष, 100 पेक्षा कमी नाहीच, ठरवले लक्ष्य!!
पण आता प्रतिष्ठा टिकवताना काँग्रेसची दमछाक होते आहे, तरी देखील काँग्रेसचे नेते बधले किंवा ठाकरे आणि पवारांसमोर पूर्ण वाकले असे त्यांच्या राजकीय हालचालींवरून दिसत नाही. उलट काँग्रेस आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी यांच्यासारख्या छोट्या पक्षांना महाविकास आघाडीत सामावून घेऊन त्यांना जागांचा थोडाफार वाटा देऊन आपले राजकीय वर्चस्व पुनर्स्थापित करायचा प्रयत्न करताना दिसत आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिल्लीतल्या स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीनंतर ही बाब समोर आणली.
भावी मुख्यमंत्र्यांना पाडण्याचे डाव
पण हे सगळे एकीकडे सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील राजकीय अस्वस्थता थांबण्यापेक्षा ती आधी वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण महाविकास आघाडीतून “जिथे – जिथे नाराजी तिथे – तिथे पाडापाडी” हे सूत्र राबविले जात आहे. शरद पवारांच्या “मनात नसलेल्या” भावी मुख्यमंत्र्यांना पाडण्याचा डाव राष्ट्रवादीतून रचला जात आहे. तो काँग्रेसला बाधणार आहे, असे राष्ट्रवादीच्याच सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्या विरोधात वेगळी “राजकीय फिल्डिंग” लावायचे काम उघड्यावर आले आहे. काँग्रेसचे “भावी मुख्यमंत्री” पाडून “मनातल्या मुख्यमंत्र्याचे” “प्यादे” पुढे सरकवायचा “डाव” यातून उघड झाला आहे.
पण पवारांचे असले “डाव” यशस्वी झाल्याचा दीर्घकालीन इतिहास नाही. त्यांनी विलासराव देशमुख यांना पाडले, पण नंतर तेच मुख्यमंत्री म्हणून सहन करावे लागले. त्यानंतर अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण हे “मनात नसलेले” मुख्यमंत्री खुर्चीवर बसलेले पाहावे लागले. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत जरी “भावी मुख्यमंत्र्यांच्या” पाडापाडीचा खेळ रंगला, तरी तो तितकासा यशस्वी होईल आणि मनातल्या मुख्यमंत्र्याचे प्यादे पुढे सरकवता येईलच, याची कुठली गॅरंटी नाही.
त्याचवेळी रोहित पवारांना पाडण्यासाठी जयंत पाटलांनी फील्डिंग लावल्याच्या बातम्या माध्यमांमधून रंगल्या आहेत. यातून “बफर मुख्यमंत्री” पाडायचा डाव रंगल्याचे उघड झाले. सगळे जागावाटपानंतरचे “डाव” आत्ताच उघड्यावर आले आहेत.
पण असले “डाव” जर पवार रचू शकतात, तर शिवसेना आणि काँग्रेस मागे राहतील का??, आणि तसे ते मागे राहणार नसतील, तर पवारांचे कोणते उमेदवार ते पाडतील??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!! उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे हे स्वतः विधानसभा निवडणूक लढवत नाहीत, हा मुद्दा इथे अधोरेखित केला पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App