नाशिक : अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला सरकारी यंत्रणा विलंब लावत असल्याचा आरोप करून अपघाताचा तपास खाजगी गुप्तहेर संस्थांकडे सोपवून रोहित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणात कायमचा खोडा घातला. कारण रोहित पवारांच्या राजकीय हालचालींविषयी आधीच संशय बळावला असताना त्यामध्ये त्यांनी स्वतःहून भर घातली.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विलीनीकरणाची घाई झाली. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर कब्जा करण्याची त्यांनी “खेळी” केली, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एकत्रितपणे ती “खेळी” उधळून लावली. त्यांना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा यांनी साथ दिली. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते खवळले आणि त्यांनी वेगवेगळे हातखंडे अजमावले, पण त्या हातखड्यांमध्ये सुद्धा अपयश आल्यानंतर जयंत पाटलांनी सुनेत्रा पवारांना मदत करण्याचा आव आणला. शशिकांत शिंदे यांनी शस्त्रे टाकली, पण रोहित पवारांनी मात्र वेगळाच “डाव” खेळला.
– रोहित पवारांनी पुढे ढकलली पत्रकार परिषद
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेचे पुरावे समोर आणण्यासाठी जाहीर केलेली पत्रकार परिषद रोहित पवारांनी सुरुवातीला रद्द केली, नंतर ती फारच पुढे ढकलून टाकली. पण याच दरम्यान केलेल्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी खाजगी गुप्तहेर संस्थांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सरकारी यंत्रणा करत असल्या तरी त्या तपासात विलंब लावतात, त्यामुळे खाजगी गुप्तहेर संस्थांकडून समांतर तपास करून घेण्याचा “डाव” रोहित पवारांनी खेळला.
– सरकारी तपास यंत्रणांच्या तपासात खोडा
रोहित पवारांच्या या “डावा”मुळे त्यांनी स्वतःहून दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणात खोडा घातला. कारण अजित पवारांच्या विमान अपघाताचा विषय हा फक्त दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा किंवा पवार कुटुंबीयांचा उरला नसून, तो राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणातला आणि एकूणच व्यवस्थेमधल्या संरक्षणाचा विषय ठरला. त्यामुळे केंद्र सरकारने सुद्धा त्यामध्ये गांभीर्याने लक्ष घातले. केंद्रीय तपास यंत्रणा कामाला लावल्या. आता त्या तपास यंत्रणा प्रत्यक्ष काम करत असताना रोहित पवारांनी जर मध्येच खाजगी गुप्तहेर संस्थांकडून तपास करायला सुरुवात केली, तर तो सरकारी यंत्रणांच्या तपासात मोठा अडथळा मानला जाईल आणि तो अडथळा केंद्रातले मोदी सरकार आणि राज्यातले फडणवीस सरकार सहन करण्याची बिलकुल शक्यता नाही. उलट रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे गांभीर्य घालवून त्याला फक्त आणि फक्त राजकीय वळण लावले, असा आरोप करायला भाजपचे नेते मोकळे होतील आणि त्यातूनच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणात कायमची पाचर मारली जाईल.
– सुप्रिया सुळे आणि रोहित पवार तोट्यात
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर एकीकडे सुनेत्रा पवारांना नेतृत्व देऊन भाजपने पवार कुटुंबीयांचेच व्यापक हित जपले आणि तरीदेखील पवार कुटुंबीय राजकीय दृष्ट्या समाधानी होणार नसतील आणि ते वेगवेगळ्या राजकीय काड्याच घालत राहणार असतील, तर भाजपचे केंद्रीय पातळीवरचे नेते आणि राज्य पातळीवरचे नेते ते बिलकुल सहन करणार नाहीत. दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र करून त्यांचे राजकीय उपद्रव मूल्य वाढू देणार नाहीत मग रोहित पवारांनी किंवा त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या शरद पवारांनी आणि सुप्रिया सुळे यांनी कितीही आदळआपट केली, तरी भाजपचे दोन्ही पातळ्यांवरचे नेते बधण्याची शक्यता नाही. त्यातून राष्ट्रवादीचे विलीनीकरण नुसतेच लांबवत नेणार नाहीत, तर ते कायमचे दुरापास्त करून ठेवतील. यात रोहित पवारांचा आणि सुप्रिया सुळे यांचा राजकीय फायदा तर सोडाच, तोटा झाल्याशिवाय राहणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App