शरद पवार फार मोठे मुत्सद्दी आहेत. ते महाराष्ट्राचे राजकारण आपल्या बोटांवर खेळवतात. पवार नेहमीच डाव टाकतात, कुणाला धोबीपछाड देतात, तर कुणाला कात्रजचा घाट दाखवतात!!, असे त्यांच्या राजकारणाचे समर्थन त्यांचे समर्थक आणि “पवार बुद्धीचे” पत्रकार अनेकदा करतात, पण पवारांचे राजकारण घसरून खाली आले याच्या खुणा अनेकदा लपवितात. पण त्या ठळकपणे दिसल्याशिवाय राहात नाहीत. Pawar family
– भाजपच्या दारात जायची वेळ
खेळाच्या राजकारणात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी पवार काका पुतण्यांना भाजपच्या दारात जायची वेळ आली हे गेल्या काही वर्षांमधल्या घडामोडीतून दिसून आले. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर शरद पवारांचे एकहाती वर्चस्व होते. ते भारतीय कुस्ती महासंघाने हाणून पाडले. तिथे भाजपने आपले वर्चस्व तयार केले. खासदार रामदास तडस यांना अध्यक्ष केले पवारांच्या वर्चस्वात पाचर मारली. पवारांनी समांतर संघटना उभी करायचा प्रयत्न केला त्याचबरोबर पवारांच्या नातवाने स्वतंत्रपणे महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवली पण त्या दोघांना फार मोठा प्रतिसाद मिळू शकला नाही. पवारांच्या एकहाती वर्चस्वाला जो तडा द्यायचा, तो भाजपने दिलाच.
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन या दोन्ही संघटनांच्या निवडणुकांमध्ये पवार काका – पुतण्यांना भाजपशी जुळवून घ्यावे लागले. दोघांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जावे लागले तिथे भाजपची तडजोड करावी लागली. भाजपने मान्यता दिल्यानंतर पवार काका पुतण्यांचे या दोन्ही संघटनांमध्ये राजकीय अस्तित्व टिकले, अन्यथा त्याला तगडे आव्हान देऊन ते मोडीत काढायचे भाजपने ठरविले होते. पण भाजपने या दोन्ही क्रीडा संघटनांमधले पवार काका पुतण्यांचे एकहाती वर्चस्व मोडून काढलेच.
– काँग्रेसला कायम हिणवले
शरद पवार आणि अजित पवार काँग्रेस नावाच्या पक्षाला अजिबात जुमानत नव्हते. शरद पवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला नेहमीच वाकवत होते. महाराष्ट्रात आपल्याला हवे तसे निर्णय हे दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींकडून करवून आणत होते. तेच शरद पवार काँग्रेसला “पडका वाडा_ म्हणाले होते. काँग्रेसची अवस्था अशा जमीनदारासारखी झाली आहे, की ज्याचा वाडा खूप मोठा होता. त्याच्याभोवती खूप मोठे शेत शिवार होते, पण आता तो वाडा पडला. शेत शिवार गेले, तरी त्या जमीनदाराला आपण मोठे आहोत असेच वाटते. तसेच काँग्रेसच्या नेत्यांना अजूनही वाटते आहे. पण काँग्रेस आता पहिल्यासारखी मोठी राहिली नाही, असे शरद पवार म्हणाले होते.
– भाजपच्या कुबड्या
पण आज त्या शरद पवारांच्या पुतण्याला “भाजपच्या कुबड्या” म्हणवून घ्यायची वेळ आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यात येऊन भाजपला आता कुबड्यांची गरज नाही. त्या फेकून द्यायला हव्यात, असे वक्तव्य केले. या सगळ्याचे अर्थ भाजपच्या विरोधकांनी “एकनाथ शिंदे म्हणजे कुबडी” आणि “अजित पवार म्हणजे कुबडी” असे काढले. रोहित पवारांनी त्यावरून अजित पवारांना टोमणे मारले. भाजप आता कुबड्या एखाद्या खोलीत सन्मानाने टांगून ठेवेल, असे वाटले होते पण त्या मोडून चुलीत घालायचा उद्योग भाजप करतोय, असे रोहित पवार म्हणाले. या वक्तव्यातून आपण आपल्याच काकांना “भाजपची कुबडी” म्हणून हिणवतो आहोत, याचे भान सुद्धा त्यांना राहिले नाही. रोहित पवार कर्जत जामखेड मधून निवडून यावेत म्हणून अजित पवारांनी महायुतीत राहून सुद्धा तिथे जाऊन सभा घेतली नाही. अजित पवारांनी रोहित पवारांवर राजकीय उपकार केले. ते त्यांनी जाहीरपणे बोलून सुद्धा दाखविले, पण रोहित पवारांनी अजित पवार यांच्या उपकारांचे पांग त्यांना “भाजपची कुबडी” म्हणून फेडले.
– काका – पुतण्याचा नक्षा भाजपने उतरविला
अजित पवार काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री राहिले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्रीच राहिले. त्यावेळी त्यांना कोणी काँग्रेसची किंवा महाविकास आघाडीची कुबडी म्हटले नव्हते, पण भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आल्यानंतर अजित पवारांना आपल्याच पुतण्या कडून “भाजपची कुबडी” म्हणवून घ्यावे लागले. शरद पवार आणि अजित पवार यांची “दादागिरी” काँग्रेसवाले सहन करत होते, किंबहुना त्यांना ती सहन करावी लागत होती, पण भाजपने अतिशय थंड डोक्याने पवार काका – पुतण्याचा “राजकीय नक्षा” चांगलाच उतरवून ठेवला. भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहण्याशिवाय त्या दोघांनाही दुसरा पर्याय शिल्लक उरू दिला नाही. किरकोळ कुठल्या निवडणुकीत एकत्र येण्यापासून भाजपने त्यांना रोखले नाही, पण मोठ्या निवडणुकीत एकत्र येण्यात मोठी पाचर मारून ठेवली. म्हणूनच रोहित पवार आणि पवार कुटुंबीयांना नुसतीच राजकीय फडफड आणि बडबड करावी लागली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App