विशेष प्रतिनिधी
मुंबई : Pawanraje Nimbalkar धाराशिवचे माजी नेते पवनराजे निंबाळकर यांच्या गाजलेल्या दुहेरी हत्याकांडाचा आज अखेर निकाल लागणार आहे. तब्बल 20 वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा अंतिम फैसला मुंबई सत्र न्यायालय आज, 20 जून रोजी सुनावणार आहे. या निकालाकडे केवळ निंबाळकर कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.Pawanraje Nimbalkar
विशेष म्हणजे, सध्या सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी 24 तास सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.Pawanraje Nimbalkar
“20 वर्षे न्यायासाठी लढलो”; ओमराजे भावुक
आज निकालासाठी न्यायालयात उपस्थित राहणार असलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना भावना व्यक्त केल्या. गेल्या दोन दशकांपासून त्यांच्या कुटुंबाने मोठा मानसिक आणि सामाजिक संघर्ष सहन केला असून आता न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“गेली 20 वर्षे आमच्या कुटुंबाने प्रचंड यातना सोसल्या आहेत. आता न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून सत्याला न्याय मिळेल, अशी आशा आहे,” असे ओमराजे म्हणाले.
भरदिवसा झालेल्या हत्येने महाराष्ट्र हादरला होता
3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
तपासाची सूत्रे पुढे केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्यात आली. सीबीआयच्या तपासात ही हत्या राजकीय वैमनस्यातून घडवून आणल्याचा दावा करण्यात आला.
25 लाखांच्या सुपारीचा आरोप
सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, तत्कालीन प्रभावशाली नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांनी 25 लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ जण आरोपी आहेत.
आरोपींमध्ये कथित शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. 16 जून रोजी निकाल अपेक्षित होता, मात्र न्यायालयाने तो पुढे ढकलत 20 जूनची तारीख निश्चित केली होती.
निकालानंतर ओमराजेंचा पुढील निर्णय?
राज्यात सध्या शिवसेनेतील राजकीय घडामोडींना वेग आला असून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबतही चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आजचा न्यायालयीन निकाल केवळ एका गाजलेल्या गुन्हेगारी खटल्यापुरता मर्यादित राहणार नसून, त्याचे राजकीय पडसादही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निकालानंतरच आपण पुढील राजकीय दिशा ठरवणार असल्याचे संकेत ओमराजे निंबाळकर यांनी यापूर्वी दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयासोबतच त्यांच्या पुढील भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App