नाशिक : पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल लागला आणि पद्मसिंह पाटलांच्या मुख्यमंत्री पदाचा दुखरा विषय राजकारण ढवळून वर आला!! त्यामुळे पद्मसिंह पाटलांना मुख्यमंत्री पदाचा शब्द कुणी दिला होता आणि कुणी त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचले??, असे सवाल सुद्धा त्याचबरोबर समोर आले. शरद पवारांच्या नातीच्या विवाहाच्या दिवशी महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्या मार्गाने पुन्हा ढवळले गेले. अर्थात शरद पवारांच्या नातीचा विवाह आणि महाराष्ट्राचे राजकारण हे दोन भिन्न विषय असले तरी त्यातला “योगायोग” बरेच काही सांगून गेला. Pawan Raje
जुन्या वजिरांकडे अंगुलीनिर्देश
पवनराजे निंबाळकर यांची हत्या होऊन २० वर्षे उलटून गेली. खटला उभा राहून सुद्धा 17 वर्षे निघून गेली. या दरम्यान महाराष्ट्राचे राजकारण अमुलाग्र बदलले. महाराष्ट्राच्या राजकारणाचे सत्ता केंद्र काँग्रेसकडून भाजपकडे आले. या राजकारणातली अनेक प्यादी, मोहरे, हत्ती, घोडे, उंट काळाच्या पडद्यावर गेले. काही वजीर सुद्धा नाहीसे झाले. महाराष्ट्रातल्या राजकारणातले त्यावेळचे काही वजीर आता प्यादी बनून शिल्लक राहिले. पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल लागल्यानंतर आता प्यादी बनलेल्या जुन्या वजीरांकडेच अंगुलीनिर्देश झाले.
पद्मसिंह पाटलांची निर्दोष सुटका
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातून पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य सगळ्या आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयाचा फायदा आणि सबळ पुराव्यांचा अभाव हे त्यासाठी कारण दिले. त्याचवेळी न्यायालयाने सरकारी तपास यंत्रणांवर ठळक प्रश्नचिन्हे उपस्थित केली. पवनराजे हत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्राचे पोलीस नीट करत नव्हते म्हणून तर ओमराजे निंबाळकर सीबीआय कडे गेले होते. त्यांनी न्यायालयात मार्फतच संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआय तर्फे करायला लावली होती. पण तरीही त्यांच्या विरोधात निकाल गेला. आता सीबीआय स्वतःच या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे.
मुख्यमंत्री पदाचा दुखरा विषय
पण त्या पलीकडे जाऊन पद्मसिंह पाटलांच्या मुलाने म्हणजेच आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पद्मसिंह पाटलांच्या मुख्यमंत्रीपदापासून ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा दुखरा विषय राजकारण ढवळून वर आणला. पद्मसिंह पाटील 1990 च्या दशकातच मुख्यमंत्री होणार होते. त्यांना तसा शब्द दिला गेला होता. पण काही कारणाने हे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध षडयंत्र करण्यासाठी पवनराजे हत्या प्रकरणाचा वापर झाला. 2009 मध्ये पद्मसिंह पाटील खासदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना स्थान मिळण्याची शक्यता होती. पण त्यावेळी काही लोकांनी पुढाकार घेऊन हत्या प्रकरणाला वेगळ्या राजकारणाची दिशा दिली. त्यामुळे पद्मसिंह पाटलांचे केंद्रीय मंत्रिपद हुकले. हे फक्त धाराशिव जिल्ह्याचे राजकारण नव्हते. ते सगळे महाराष्ट्राचे राजकारण होते, याची आठवण राणा जगजीत सिंह पाटील यांनी करून दिली.
संशयाची सुई
त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणात संशयाची सुई काँग्रेसमधल्या त्या वेळच्या अंतर्गत राजकारणाकडे गेली. 1990 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्याच मंत्रिमंडळात पद्मसिंह पाटील गृहमंत्री होते. सुधाकरराव नाईक हे सुद्धा सीनियर मंत्री होते. 1991 मध्ये शरद पवारांनी पंतप्रधान पदाला गवसणी घातली होती. त्यांनी नरसिंह रावांशी संघर्ष करून पाहिला, पण त्यात ते पराभूत झाले. नरसिंह राव पंतप्रधान झाले. पवारांनी नरसिंह रावांशी जुळवून घेतल्यानंतर नरसिंह रावांनी त्यांना केंद्रात संरक्षण मंत्री केले. त्यावेळी शरद पवारांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. पण शरद पवारांनी त्यावेळी पद्मसिंह पाटील यांच्या ऐवजी सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री करणे पसंत केले होते. अर्थात त्यामागे काँग्रेस मधल्या राजकारणाचे सगळे ताणबाणे होते. शरद पवार एकटेच कुठला निर्णय घेऊ शकत नव्हते. पण महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या शब्दाला “वजन” होते. मग त्यांनीच पद्मसिंह पाटलांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द देऊन नंतर तो फिरवला का??, असा सवाल राणा जगजीत सिंह यांच्या वक्तव्यामुळे पुढे आला.
शरद पवारांचे “वजन” कमी पडले का??
त्यानंतर सुद्धा पद्मसिंह पाटलांना मुख्यमंत्री पदाची संधी आली होती. कारण 1992 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगल या पार्श्वभूमीवर सुधाकरराव नाईक यांचे मुख्यमंत्रीपद गेले. त्यावेळी पद्मसिंह पाटलांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी जोरात चालले होते. शरद पवारांनी सुद्धा पद्मसिंह पाटलांच्याच पारड्यात वजन टाकल्याच्या बातम्या त्यावेळी आल्यावर होत्या. पण नरसिंह रावांनी शरद पवारांनाच केंद्रीय मंत्री पदावरून बाजूला करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पाठवून दिले होते. त्यामुळे 1992 – 93 मध्ये पद्मसिंह पाटलांचे मुख्यमंत्रीपद पुन्हा हुकले. मग त्यावेळी शरद पवार पद्मसिंह पाटलांना मुख्यमंत्री का करू शकले नाहीत?? शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने पद्मसिंह पाटलांच्या पारड्यात “वजन” टाकल्यानंतर सुद्धा ते “वजन” कमी पडले होते का??, असे सवालही आजच्या निकालाच्या निमित्ताने समोर आले.
पद्मसिंहांना केंद्रात मंत्री का नाही केले??
2009 मध्ये शरद पवार हे मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषिमंत्री होते. त्यांच्याच बरोबर प्रफुल्ल पटेल आणि सूर्यकांता पाटील हे अनुक्रमे केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री होते. या तीन नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा कोटा भरला होता. मग 2009 मध्ये शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल किंवा सूर्यकांता पाटील यांच्या ऐवजी पद्मसिंह पाटलांना केंद्रीय मंत्री का केले नाही??, शरद पवारांना तसे करण्यापासून कुणी रोखले होते??, हा सवाल सुद्धा राणा जगजीत सिंह पाटलांच्या वक्तव्यामुळे समोर आला.
पवार + पटेलांना प्रश्न विचारतील??
1990, 1992 – 93 आणि 2009 या कालावधीत घडलेल्या राजकारणातली अनेक प्यादी, हत्ती, घोडे, उंट आज राजकीय बुद्धिबळाच्या पटावर नाहीत. पण शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोन नेते तर आज राजकारणाच्या पटावर आहेतच. भले ते आज वजीर म्हणून उरले नसतील, पण प्यादी म्हणून तर त्यांचे काम सुरूच आहे. अशा स्थितीत राणा जगजीत सिंह पाटलांनी उपस्थित केलेल्या सगळ्या सवालांची उत्तरे त्यांच्याकडे मिळू शकतील. पण राणा जगजीत सिंह यांनी माध्यमांसमोर उपस्थित केलेले प्रश्न ते या दोन नेत्यांना थेट विचारतील का??, हा खरा सवाल आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App