नाशिक : इकडे महाराष्ट्रात काका – पुतण्यांच्या ऐक्याची निष्फळ चर्चा; तिकडे नागालँड मध्ये 7 आमदारांनी अजितदादांचा आख्खा पक्षच गुंडाळला. महाराष्ट्र आणि नागालँड मध्ये एकाच वेळी या घडामोडी घडल्या.
अजित पवार यांच्या सत्तेच्या तुकड्यात वाटा निर्माण करण्यासाठी शरद पवारांनी दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याची पुडी महाराष्ट्रात सोडली. पवारनिष्ठ माध्यमांनी महाराष्ट्रात भूकंपाची चर्चा घडवली. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी शरद पवारांचा “डाव” ओळखला. सत्तेच्या तुकड्यात वाटा निर्माण झाला, तर आपल्याच राजकीय भवितव्याला सुरुंग लागेल. भाजप आणि राष्ट्रवादी आपल्याला विचारणार नाहीत. सत्तेमध्ये थोडा देखील वाटा देणार नाहीत. अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे दोनच नेते लाभार्थी ठरतील आणि आपण बाराच्या भावात जाऊ हे लक्षात आल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी एकीकरणाला विरोध केला. त्यामुळे शरद पवारांना मला काही माहिती नाही, असे उत्तर घेऊन राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा गुंडाळावी लागली. त्यामुळे सध्या तरी अजित पवारांच्या सत्तेच्या तुकड्यात वाटा पडता पडता राहिला.
पण तिकडे नागालँड मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 आमदारांनी सगळ्या पक्षच गुंडाळून सत्ताधारी पक्षात सामील केला. त्यामुळे NDPP या सत्ताधारी पक्षाचे आमदार वाढले. सत्ताधारी पक्ष पूर्ण बहुमतात आला आणि अजित पवारांचा पक्ष पूर्ण रिकामा झाला. आता अजित पवारांची राष्ट्रवादी पक्षातून फुटलेल्या 7 आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्याद्वारे कारवाई करायचा विचार करत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आमदारकी एकाच दिवसात सत्ताधारी पक्षात सामील झाले नाहीत. त्याआधी तिथे सत्तावाटपाची भरपूर चर्चा झाली, पण त्याची साधी भनक देखील महाराष्ट्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना लागली नाही. आता सगळेच्या सगळे आमदार फुटून न सत्ताधारी पक्षात निघून गेल्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जागा आली आणि त्यांनी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
वास्तविक नागालँड मधले 7 आमदार अखंड राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. अर्थात त्यामध्ये शरद पवार किंवा अजित पवार यांच्या राजकीय प्रभावाचा काहीही संबंध नव्हता. हे सगळे आमदार आपल्या स्थानिक प्रभावावरच निवडून आले होते पण फक्त कुठल्यातरी पक्षाचे तिकीट हवे म्हणून त्यांनी स्वतःहून राष्ट्रवादीचे तिकीट निवडले होते. पण त्यामुळे सुरुवातीला शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्षाचे मान्यता मिळायला फार मोठी मदत झाली होती.
अजित पवार हे शरद पवारांपासून अलग झाल्यानंतर नागालँड मधल्या या 7 आमदारांनी अजित पवारांना साथ दिली. महाराष्ट्रात अजित पवार जर भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसू शकतात, तर आपण नागालँड मध्ये तसे करायला काय हरकत आहे??, असा विचार करून या सगळ्या आमदारांनी सत्ताधारी NDPP पक्षाला सुरुवातीला पाठिंबा दिला. पण नंतर सत्तेचा तुकडा वाढवून मिळावा म्हणून आपला अख्खा पक्षच परस्पर NDPP मध्ये विलीन करून टाकला. इथे अजित पवारांना धक्का बसला. कारण या सातही आमदारांनी अजित पवारांची त्यासाठी परवानगीच घेतली नव्हती. आता हे हे 8 आमदार निघून गेल्यानंतर नागालँड मधल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय अस्तित्वच संपून गेले आहे. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या “राष्ट्रीय पक्ष” म्हणून अधिमान्यतेला धोका निर्माण झाला आहे.
तसेही अजितदादांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिमान्यतेची फारशी फिकीर नव्हतीच, कारण त्यांना सगळे राजकारण महाराष्ट्रातच करायचे होते, पण आता ते केवळ महाराष्ट्रातले राजकारणी राहिले नसून त्यांनी काकांच्या हातातून पक्ष काढून घेऊन स्वतःच्या नावावर चालवायला सुरुवात केल्याने पक्षाध्यक्ष म्हणून अजितदादांची जबाबदारी वाढली आणि म्हणूनच पक्षाच्या राष्ट्रीय अधिमान्यते विषयी त्यांना आपोआपच “चिंता” निर्माण झाली. म्हणूनच पक्षाच्या 7 आमदारांवर पक्षांतर बंदी अंतर्गत कायदेशीर कारवाईची वेळ आली. पण अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तो करणार असलेली कारवाई सगळाच राजकीय विनोदाचा भाग ठरण्याची शक्यता आहे. कारण नागालँड मधले 7 आमदार असल्या कारवाईला भिण्याची अजिबात शक्यता नाही. एकतर ते सगळेच्या सगळे 7 आमदार फुटून बाहेर पडलेत आणि नागालँड मधल्या विधानसभेच्या सभापतींनी त्यांच्या विलीनीकरणास मान्यता देऊन टाकली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App