मुंबई : Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने सादर केलेल्या मसुद्याची काटेकोर तपासणी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. “मागील वेळी सरकारने वाशी येथे जीआर देऊन आमची फसवणूक केली होती. यावेळी आम्ही सावध आहेत आणि कोणतीही चूक होऊ देणार नाही,” असे जरांगे यांनी ठणकावून सांगितले.
मसुद्याची बारकाईने तपासणी
मंत्रिमंडळ उपसमितीने जरांगे यांच्याकडे सोपवलेला मसुदा त्यांनी अत्यंत सावधगिरीने तपासला. हा मसुदा केवळ स्वतः वाचून पाहण्यापुरता मर्यादित न ठेवता, त्यांनी तो पत्रकार, अभ्यासक आणि वकील यांच्या तज्ज्ञ गटाकडून तपासून घेतला. या तपासणीत मसुद्यात कोणत्याही त्रुटी नसल्याची खात्री झाल्यानंतरच त्यांनी मसुद्याला मान्यता दिली. “हा मसुदा आमच्या मागण्यांनुसार योग्य आहे, त्यामुळे आम्हाला तो मान्य आहे,” असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
सरकारला इशारा: फसवणूक झाल्यास खपवून घेणार नाही
जरांगे यांनी सरकारला कडक शब्दांत इशारा दिला की, जर या जीआरमध्ये कोणतीही फसवणूक आढळली, तर “महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला किंवा आमदाराला फिरू देणार नाही.” असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
मंत्रिमंडळ उपसमितीशी चर्चा
मंत्रिमंडळ उपसमितीच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत जरांगे यांनी सरकारशी चर्चा केली. सरकारने त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्याने समाधान व्यक्त करत त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. “सरकारने जीआर दिला आणि तो आमच्या तपासणीत योग्य आढळला, तर आम्ही एका तासात मुंबई खाली करू,” असे जरांगे यांनी ठामपणे सांगितले.
आझाद मैदानावरील उत्साही वातावरण
आंदोलनाच्या यशस्वी समारोपामुळे आझाद मैदानावर उत्साहाचे आणि विजयोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. आंदोलकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी आनंद साजरा केला. मराठा समाजाच्या मागण्यांना यश मिळाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला असून, आता आंदोलन गावाकडे परतण्याची तयारी सुरू आहे.
मराठा समाजाच्या मागण्यांचा विजय
मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाने सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने एकजुटीने लढा देत आपली मागणी यशस्वीपणे मांडली. यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे, तर मुंबईकरांना पुन्हा मोकळा श्वास घेता येणार आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कशी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आता मुंबई मोकळा श्वास घेण्यास सज्ज आहे, तर मराठा समाज आपल्या विजयाचा आनंद साजरा करत आहे!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App