विशेष प्रतिनिधी
मुंबई : “निधी वाटपात अन्यायाच्या शिवसेना आमदारांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे, तरी देखील बजेटमध्ये राष्ट्रवादीच पुढे…!!” अशी स्थिती महाविकास आघाडीत कायम आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 25 ते 30 शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या निधीसाठी अक्षरशः धोशा लावला. तक्रारी केल्या. पत्रकार परिषदांमध्ये व्यथा मांडल्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेरीस महाराष्ट्राच्या 2022 – 23 च्या बजेट मध्ये राष्ट्रवादीच्याच खात्यांना जास्त निधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. Maharashtra Budget 2022: 25 Shiv Sena MLAs’ complaints to CM; Even so, the NCP is ahead in the budget … !!
2022-23 या आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक खात्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. पण यातील आकड्यांवर “उघडून डोळे नीट पाहिले” असता, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अखत्यारीत असणा-या खात्यांना शिवसेनेपेक्षा सर्वाधिक निधी देण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी होणार का?, अशा चर्चांना आता राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणा-या एकूण 12 खात्यांसाठी एकूण 3 लाख 14 हजार 820 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ही तरतूद शिवसेनेच्या खात्यांपेक्षा तिप्पट असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना नेत्यांकडे असलेल्या खात्यांच्या वाट्याला केवळ 90 हजार 181 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर काँग्रेसच्या खात्यांना देखील शिवसेनेपेक्षा जास्त म्हणजेच 1 लाख 44 हजार 193 कोटींचा निधी देण्यात आला आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याला शिवसेनेला मिळालेल्या एकूण निधीच्या निम्मा निधी देण्यात आला आहे. नगर विकास खात्यासाठी अर्थसंकल्पात 44 हजार 306 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाला 12 हजार 364 कोटी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला 11 हजार 1 कोटी, तर कृषी विभागाला एकूण 12 हजार 721 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्या वित्त खात्याला 1 कोटी 43 हजार 600, नियोजन विभागाला 25 हजार 577 कोटी, ग्रामविकास विभागाला 26 हजार 593 कोटी, तर जयंत पाटील यांच्या जलसंपदा विभागासाठी 19 हजार 766 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
निधी वाटपाच्या बाबतीत आपल्यावर कायमच अन्याय होत असल्याचे सांगत, शिवसेना आमदारांनी अनेकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस आमदारांनीही आपल्याला मिळणा-या निधीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे या मुद्द्यावरुन आघाडी सरकारमधील नाराजी नाट्य लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अर्थसंकल्पाच्या वेळी दाखवून देऊ असे 25 ते 30 शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. आता प्रत्यक्ष अर्थसंकल्प जरी मांडला असला तरी अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या वेळी शिवसेनेचे हे 25 ते 30 आमदार नेमके काय करतात?, हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App