विशेष प्रतिनिधी
पुणे : समाजात अनेक समस्या असून त्या सोडविण्याचे आणि समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य सामाजिक संस्था करत आहेत. ‘मी अधिकारी नाही, तर कार्यकर्ता आहे,’ ही कार्यकर्त्यांची भावना अत्यंत स्तुत्य आहे. सध्या निसर्ग आणि मनुष्य यांच्यातील समतोल बिघडत असून त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. हा समतोल राखून शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ‘केपीआयटी’चे सहसंस्थापक रवी पंडित यांनी केले. Sevatarang 2026
सेवावर्धिनी संस्थेच्या वतीने सामाजिक संस्थांसाठी आयोजित ‘सेवातरंग २०२६’ या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुणे येथील बायफ सभागृहात भारतमाता पूजनाने या कार्यशाळेचा शुभारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर सेवावर्धिनीचे कार्याध्यक्ष सुहास लुंकड, सहकार्याध्यक्ष शैलेंद्र कवाडे, कार्यवाह सोमदत्त पटवर्धन, कार्यकारी मंडळ सदस्य विक्रम पंडित आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश देगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात सुहास लुंकड यांनी दानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “देशातील सुमारे ४० टक्के दान हे आर्थिकदृष्ट्या सामान्य स्तरातील लोकांकडून येते. आपण समाजाचे देणे लागतो, ही दानाची संस्कृती आणि संस्कार भारतीय समाजव्यवस्थेत खोलवर रुजलेले आहेत. तन, मन व धन समाजासाठी अर्पण करण्याचे हे संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आपल्यावर झाले आहेत.”
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यवाह सोमदत्त पटवर्धन यांनी सेवावर्धिनीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ‘संस्था केवळ प्रशिक्षणापुरती मर्यादित न राहता, सामाजिक संस्थांसोबत प्रत्यक्ष प्रकल्प राबवून त्यांना सक्षम करण्याचे काम करत आहे,’ असे त्यांनी नमूद केले. तत्पूर्वी, सुहास लुंकड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गिरीश देगावकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला, तर विक्रम पंडित यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
– कार्यशाळेत विविध विषयांवर मंथन
दोन दिवसीय कार्यशाळेत विविध सामाजिक प्रकल्पांच्या ‘केस स्टडीज’, स्वयंसेवकांसाठीच्या संधी, तसेच आर्थिक व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावसकर यांची विशेष मुलाखत या कार्यशाळेचे मुख्य आकर्षण असणार आहे. या निवासी कार्यशाळेस राज्याच्या २५ जिल्ह्यांमधून १३० स्वयंसेवी संस्थांचे सुमारे १७५ प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App