विशेष प्रतिनिधी
मुंबई : Gulabrao Patil राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता, असा खळबळजनक दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी देखील संजय राऊतांबद्दल असाच काहीसा दावा केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.Gulabrao Patil
राज्यातील शिवसेनेत फूट पडून तीन वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी, दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि दावे-प्रतिदावे अजूनही सुरूच आहेत. संजय राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू दररोज माध्यमांतून मांडतात. शिंदे गटाच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडत नाहीत. शिवसेना सोडून गेलेल्यांना ते गद्दार म्हणतात. मात्र संजय राऊत हेच सर्वात आधी फुटणार होते. त्यांनीच शिवसेना हायजॅक करायचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, ते त्यावेळेस थांबले, असा खळबळजनक दावा राज्याचे मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेतील नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे. शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्याच्या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गुलाबराव पाटलांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
संजय राऊतांना गुवाहटीला यायचे होते
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते आणि काय झाडी, काय डोंगार, काय हाटील फेम शहाजी बापू पाटील यांनी देखील संजय राऊतांबाबत असाच दावा केला होता. संजय राऊत यांनाही आमच्यासोबत गुवाहाटीला यायचे होते. पण त्यावेळी 30 ते 35 आमदारांचा त्यांना विरोध होता. त्यामुळे त्यांना येता आले नाही. यामुळेच राऊत आजही चिडचिड करून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात, असे शहाजी बापू पाटील म्हणाले होते. सद्यस्थितीत ठाकरे गटातील अनेक आमदारांना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य आहे. त्यामुळे लवकरच राज्यात राजकीय घडामोडी घडतील, असे ही त्यांनी म्हटले होते.
2022 मध्ये फुटली शिवसेना
2022 मध्ये शिवसेनेत झालेली बंडखोरी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. त्यामुळे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. या घटनाक्रमामुळे शिवसेना दोन गटांत विभागली गेली. शिंदेंनी मूळ शिवसेना हस्तगत करून भाजपच्या मदतीने युती सरकार स्थापन केले, तर उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ म्हणून पुढे वाटचाल सुरू केली. तेव्हापासून संजय राऊत शिंदे गटाच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडत नाहीत. रोजच्या रोज माध्यमांद्वारे ते ‘गद्दार’, ‘धोकेबाज’ अशी टीका शिंदे गटावर करत असतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App