नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका!!, असा सल्ला म्हणे, काँग्रेसच्या हायकमांडने महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना दिला. काँग्रेस सावध झाल्याच्या नावाखाली या बातम्या सर्व मराठी माध्यमांनी दिल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका. काँग्रेस पक्ष स्वतःच्याच बळावर वाढवा. काँग्रेस पक्षाचे कार्यक्रम स्वतंत्रपणे लोकांपर्यंत न्या, असा सल्ला म्हणे काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना दिला आहे.Congress High command gave excessive importance to Sharad Pawar
पण मूळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका, असा सल्लावजा सूचना द्यायला काँग्रेसची हायकमांड हवीच कशाला??, महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहून चालणार नाही, याची माहितीच नाही का??, हा खरा सवाल आहे.
राष्ट्रवादी अखंड असो किंवा तुटलेली असो, शरद पवारांनी अख्ख्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे भरण पोषण तर काँग्रेस फोडून आणि तोडून तर केले होते. मग तेव्हा काँग्रेसचे नेते झोपी गेले होते का?? काँग्रेसचे हायकमांड कोमात गेले होते का??, असा सवाल काँग्रेसच्या हायकमांडला विचारला पाहिजे.
– पवारांचे राजकारण भरवशाच्या लायकीचे होते कधी??
मूळात पवारांचे राजकारण भरवसा ठेवण्याच्या लायकीचे कधीच नव्हते, हे काँग्रेस हायकमांडने अनेकदा अनुभवले. पण हायकमांड त्यातून शिकली नाही. महाराष्ट्रात काँग्रेसलाच राष्ट्रवादी काँग्रेसची गरज आहे, असे मानून काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुढे शरणागती पत्करली. शरद पवार “ज्येष्ठ नेते” आहेत, याचा एवढा बाऊ करून ठेवला, की काँग्रेसचे त्यांच्याच वयाचे किंबहुना त्यांच्या आसपासच्या वयाचे सगळे नेते काँग्रेसनेच स्वतःहून “छोटे” करून ठेवले. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे हे काही छोटे नेते नाहीत. ते सुद्धा वयाने पवारांच्या आसपासचे नेते आहेत, पण काँग्रेसने विशेषतः काँग्रेस हायकमांडने त्यांना “पवारांच्या इतके महत्त्व” दिले नाही. हा या नेत्यांचा दोष नाही. तो काँग्रेस हायकमांडचा दोष आहे. विलासराव देशमुख हयात असताना त्यांचे महत्त्व काँग्रेस हायकमांडने पवारांपेक्षा जास्त वाढवून ठेवले असते, तर पवारांच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याच नेत्यांवर आली नसती, पण काँग्रेस हायकमांडने काँग्रेसच्या नेत्यांचाच आत्मविश्वास वाढविला नाही. त्यांना योग्य वेळी आणि योग्य तऱ्हेचे बळ दिले नाही, म्हणून तर महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांवर पवारांच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ आली.
– काँग्रेस हायकमांडनेच पवारांना डोक्यावर बसवले
महाराष्ट्रात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे सरकार अजित पवारांची “दादागिरी” चालली. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी जुमानले नाही यात अजित पवारांचे राजकीय कर्तृत्व “फार मोठे” होते, असे समजायचे कारण नाही किंवा “दादागिरी” करायचा त्यांचा स्वभावच होता अशा पद्धतीची शरणागती पत्करूनही चालणार नाही. उलट काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या अधिकारांचा वापर करून त्यांच्यावर वचक का नाही ठेवला??, हा सवाल वेळीच विचारून काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेसच्या हायकमांडनेच बळ देणे अपेक्षित होते. पृथ्वीराज चव्हाण वगळता बाकी कुठल्याही मुख्यमंत्र्याला राष्ट्रवादीच्या नाकात वेसण घालता आली नाही. याचे कारण काँग्रेसचे मुख्यमंत्री दुबळे होते असे नाही, तर काँग्रेसचे हायकमांड शरद पवारांसारख्या प्रादेशिक नेत्याला अवास्तव महत्त्व देत होते, हे आहे!!
– ही चूक काँग्रेस हायकमांडचीच!!
आता जेव्हा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाने महाराष्ट्रात पक्षाचे फार मोठे बळ वाढेल, असा आव शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणला असताना प्रत्यक्षात त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बारामतीत सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढवता आली नाही, हे वास्तव आजच समोर आले. अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर बारामतीतला मतदार मतदानासाठी घराबाहेर पडला नाही. त्याने भरभरून मतदान केले नाही. याचा अर्थ अजित पवारांच्या एक्झिटची सहानुभूती सुद्धा राष्ट्रवादीला फारशी उपयोगी पडलेली दिसली नाही. मग महाराष्ट्रातला मतदार जर शरद पवार किंवा अजित पवारांची “राजकीय किंमत” फार मर्यादित ठेवत असेल, तर काँग्रेसच्या हायकमांडला किंवा महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना शरद पवारांची एवढी पत्रास ठेवायचे काय कारण??, हे त्यावेळीच विचारायला हवे होते आणि राष्ट्रवादी सारख्या पक्षाच्या नाकात त्याचवेळी वेसण घालायला हवी होती. काँग्रेसच्या हायकमांडने सत्ता असताना ते केले नाही, म्हणून तर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस वर भरवसा ठेवू नका. अवलंबून राहू नका, असा सल्ला द्यायची वेळ काँग्रेस हायकमांड वर आली. यात महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची चूक नाही. काँग्रेस हायकमांडची चूक आहे, ही वस्तुस्थिती नाकारण्यात मतलब नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App