विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातल्या कुठल्याही निवडणुकी संदर्भात काँग्रेस सह बाकीच्या विरोधी पक्षांनी आत्तापर्यंत मतदानानंतर आणि मतमोजणी नंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात EVM वर ठपका ठेवला. पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षात मतदान होण्यापूर्वीच काँग्रेस सह विरोधकांनी मतदार यादी आणि नोंदणीवरच आक्षेप घेतला आहे.
काँग्रेस किंवा विरोधकांमधले प्रादेशिक पक्ष निवडणूक जिंकले की EVM कुणी आक्षेप घेत नाही. पण कुठलीही निवडणूक ते हरले की ताबडतोब EVM वर आक्षेप घेणे सुरू होते. पण आता त्यापलिकडे जाऊन काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी मतदार यादी आणि नोंदणीवरच आक्षेप घेतला आहे.
राज्यातील 150 मतदारसंघ ठरवून एका ॲपच्या माध्यमातून 10000 मते काढून टाकून त्या ठिकाणी बोगस मतदान मतदार नोंदणी होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. हे कटकारस्थान करणारे सूत्रधार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
ज्या मतदारसंघांमध्ये मतदार यादीमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे ते मतदारसंघ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समोर आणल्याचा दावा केला आहे. जर हा प्रकार थांबला नाही तर आम्ही या विरोधात मोर्चा काढू असा इशारा सुद्धा महाविकास आघाडीने दिला आहे.
महायुतीवाल्यांना आम्ही लफंगे म्हणतो
काल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मतदारयादींमध्ये होत असलेल्या गोंधळाविरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात आली होती. या संदर्भाने आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मतदारयादीमध्ये कशा पद्धतीने गोंधळ घातला जात आहे, या संदर्भातील माहिती दिली. खासदार संजय राऊत म्हणाले की, महायुतीवाल्यांना आम्ही लफंगे म्हणतो. एक प्रकारे ते पराभवाला घाबरले असल्याने लोकशाही विरोधात मोठे कट कारस्थान केलं जात आहे. त्या अनुषंगानेच आम्ही काल निवडणूक आयोगाला भेटलो होतो, असं संजय राऊत यांनी सांगितलं. शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला ईस्ट, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर आणि धामणगाव या मतदारसंघात मतदार यादीत गोंधळ असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. अजूनही इतर मतदारसंघाची माहिती घेत असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही या मतदारयादीबद्दल राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणी केली. मात्र, राज्यातील निवडणूक पारदर्शकपणे होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग हा मोदींच्या पायाशी बसला आहे का??, अशी विचारणा सुद्धा नाना पटोले यांनी केली. ते पुढे म्हणाले की लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आम्ही कदापि होऊ देणार नाही. हे पाप निवडणूक आयोगाने थांबवलं पाहिजे.
एका दिवसात 2844 मतदार कसे वाढले?
ते म्हणाले की शिर्डीमधील लोणी गावांमध्ये 2844 मतं लोकसभेनंतर वाढवण्यात आली आहेत. मुसलमान, बौद्ध यांची मत कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सुद्धा नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले की मतदार म्हणून तुम्ही सतर्क झाला पाहिजे. आपले मतदान बरोबर आहेत की नाही हे तपासले पाहिजे. निवडणूक आयोगामधील काही अधिकारी भाजपच्या आदेशाने काम करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. 10 ते 15 हजार मतदारांची नावे कमी करण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्यात बदल्यामध्ये बाहेरील राज्यातील मतदार या वाढवले जात आहेत. एका दिवसात 2844 मतदार कसे वाढतात? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिर्डी, चंद्रपूर, अकोला, नागपूर, चिमूर, धामणगाव या ठिकाणी मतदार यादीत गोंधळ केला गेला आहे. निवडणूक आयोग सरकारचा कठपुतळी झाल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. हा सर्व प्रकार धकादायक असून लोकशाही संपवणारा आहे. त्यामुळे मतदार यादी चेक कराव्यात आणि भाजप कटकारस्थान करून पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे त्याची कल्पना मित्र पक्षांना सुद्धा नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App