वृत्तसंस्था
मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव रोखता रोखता येईना. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे तर दुसरीकडे लसीकरणावर भर देण्यात आला आहे. आता राज्यातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. CM uddhav thackery writes PM narendra modi to vaccinate all above 25 age
कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे, त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वाना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे.
मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्याने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती मांडली असून चाचण्याचा वेगही प्रयत्नपूर्वक वाढवला आहे. प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झालाच पाहिजे या निर्धाराने आम्ही उपाययोजना करीत आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक हानिकारक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ब्रेक दि चेन या मोहिमेच्या माध्यमातून काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र यात जीवनावश्यक वस्तू व सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहील आणि कोविडसाठी आरोग्याचे नियम सर्वजण पाळतील अशी कार्य पद्धती ठरविली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत, असेही या पत्रात म्हटले आहे.