विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bhaskar Jadhav नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी विरोधी पक्ष नेत्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने टीका केली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते, विरोधी पक्षनेता दिला तर सरकारमधील सहकारी त्याला माहिती देऊन आपल्याला अडचणीत आणतील अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे सरकार विरोधी पक्षनेत्यावर कोणताही निर्णय घेत नाही, अशी टीका जाधव यांनी केली आहे.Bhaskar Jadhav
महाविकास आघाडीकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्र देण्यात आले असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मात्र, सरकारने आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेते पद देण्याची तयारी दाखवली तर त्यांच्यासाठी एका क्षणात मी त्याग करेन, असेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले आहेBhaskar Jadhav
भास्कर जाधव म्हणाले, दहा टक्के आमदार असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद दिले जाते. जेव्हा पक्षाच्या गटनेतेपदी माझी निवड झाली तेव्हा हे शक्य आहे असे मला वाटले. मी सचिवांना पत्र लिहले. विरोधी पक्ष नेतेपद निवडीसंदर्भात कायद्यात तरतूद काय याची माहिती लिखित द्यावी अशी मागणी केली. त्यावेळी अशी 10 टक्के सदस्यसंख्येची अट नाही, अशी माहिती सचिवालयाने दिली.
तसेच या सरकारमधील भ्रष्टाचाराची जी प्रकरणे बाहेर येत आहेत ते हिमनगाचे एक टॉक आहे. हे लोक एकमेकांचे पाय ओढत आहेत. विरोधी पक्षनेत्याची घोषणा झाली तर सरकारमधील लोक विरोधी नेत्याला माहिती देऊन एकमेकांना अडचणीत आणतील अशी त्यांना भीती आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी जर ठरवले तर विरोधी पक्षनेतेपद देणे शक्य
पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळ्यांची भेट घेतली. उद्धव साहेब विधानसभा अध्यक्षांना भेटले, त्यांनीही मागणी केली होती. दोन्ही सदनाचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. मंत्र्यांना पीएस कोण द्यायचा हे मुख्यमंत्री ठरवतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जर ठरवले तर विरोधी पक्षनेतेपद देणे शक्य आहे. मात्र ते एकमेकांवर टोलवत आहेत, असे जाधव म्हणाले.
सत्ता स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्यात कुरबुरी
भास्कर जाधव म्हणाले, एक वर्ष सत्ता स्थापनेला पूर्ण झाली. वेगवेगळ्या अभ्यासकांनी जी मतं दिली त्यात कुणी त्यांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क दिले नाहीत. मी या सरकारला साडे तीन मार्क देतो. हे सरकार अनपेक्षितपणे तयार झालेले सरकार आहे. 45 खासदार आम्ही निवडणून आणू अशा प्रकारच्या वल्गना करत होते, त्यांना 16 च्या पुढेही जाता आले नाही. विधानसभेत हेच होणार असे वाटत होते. शिंदेंच्या मार्फत वारेमाप आश्वासन दिली गेली. त्यांना मुख्यमंत्री करू असे खासगीत आश्वासन दिले अशी माझी माहिती आहे. पण तसे झाले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या पहिल्या दिवसांपासून त्यांच्यात कुरबुरी सुरू आहेत.
सत्ता आल्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्रिपदावर क्लेम करायला तोंड राहिलेले नाही. जर शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले नसते तर भाजप सत्तेत आले नसते. सत्ता आल्यानंतर शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार नव्हते. पण मुख्यमंत्रीपद भाजपने काढून घेतल्यानंतर ते कुठल्या तोंडाने बोलणार? असेही भास्कर जाधव म्हणाले.
मी जे सत्य असेल तेच बोलतो, खोटे बोलत नाही
भास्कर जाधव नाराज असल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. यावर बोलताना ते म्हणाले, मी माझ्या राजकीय जीवनात कुठल्याही कारणासाठी नाराजी व्यक्त केलेली नाही. जे सत्य असेल तेच बोलतो, खोटे बोलत नाही. मी एकदा शब्द दिला की मी तो पूर्ण करण्यासाठी काहीही किंमत मोजायला तयार असतो. माझ्या 43 वर्षाच्या राजकीय प्रवासात मी कधी कुणाकडे कुठलीही गोष्ट मागितली नाही. जर चुकीचे काही असेल तर मी त्या विरोधात बोलताना कुणताही मुलाहिजा राखत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा मंत्रिमंडळात माझा समावेश झाला नाही. तेव्हा मी भावना बोलून दाखवली होती.
ठाकरेंची शिवसेना संपणार नाही
कोकणातील स्थितीचे वास्तव स्वीकारले पाहिजे, त्या ठिकाणी शिवसेनेत दोन भाग झाले. भाजप सोबत होते तेव्हा त्यांनी पण शिवसेनेला पोखरले. विरोधकांचे रोज पक्ष प्रवेश होत आहेत तरी ठाकरेंची शिवसेना संपणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्षनेता नसणे ही लोकशाहीची थट्टा- हर्षवर्धन सपकाळ
सत्ताधाऱ्यांना शर्म वाटली पाहिजे की ते अधिवेशन समोर रेटत आहेत. अधिवेशन कमी काळाचे आहे आणि विरोधी पक्षनेता नसणे हे लोकशाहीची थट्टा असल्याची टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. 10 टक्के निकष हा कुठलाही संकेत नाही किंवा संवैधानिक स्वरूपात त्याचा उल्लेख नाही. वरच्या सभागृहात कॉंग्रेसचे 10 टक्के सदस्य आहेत. त्या अनुषंगाने आम्ही आमचा प्रस्ताव सादर केलेला आहे, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App