वनसंपदेने समृद्ध असणाऱ्या आसाम राज्यातल्या जंगलात अचानकपणे अठरा हत्ती मृत झाल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ माजली. अठरा हत्तींच्या या मृत्यूनंतर स्थानिकांमध्ये दुःखाची लहर पसरली आहे. एकदम अठरा हत्तींचा कळप मृत्यूमुखी कशामुळे पडला याचा तपास चालू आहे. प्राथमिक अंदाजानुसार वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. The unfortunate death of 18 elephants in the forests of Assam: a massacre, or a lightning strike? Investigation underway
वृत्तसंस्था
दिसपूर : भारताच्या ईशान्येकडील आसाममध्ये अठरा वन्य हत्तींचा कळप शुक्रवारी मृतावस्थेत आढळून आला. वादळी पावसात झालेल्या विजांच्या तीव्र चकमकीत हा कळप सापडला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी या परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला होता. स्थानिकांना जंगलात गेल्यानंतर पंधरा प्रौढ हत्तींचे मृतदेह सापडले. आणखी चार हत्ती थोड्या अंतरावर मरणासन्न अवस्थेत सापडले. ग्रामस्थांनी तातडीने या घटनेची खबर वन्य विभागाला दिली.
आसाममधल्या कुंडोली राखीव वनक्षेत्रात ही दुर्घटना आढळून आली. आसामची राजधानी दिसपूरपासून 160 किलोमीटर अंतरावर हे वनक्षेत्र आहे. आसाम राज्य सरकारने या दुर्घटनेची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
आसामचे वन्यमंत्री परिमल सुकलबैद्य यांनी सांगितले की, “प्राथमिक अहवालानुसार वीज कोसळल्याने हत्तींचे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी आम्ही काही फॉरेन्सिक चाचण्या करून अधिक शोध घेत आहोत. हत्तींवर विषप्रयोग झाला का, त्यांना कोणता आजार होता का हे शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे.“
ज्या परिसरात हत्तींचे मृतदेह आढळले त्या भागात बुधवारी उशिरा वीज कोसळल्याच्या घटना घडल्या असे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिक आणि वनविभागाच्या रेंजरच्या म्हणण्यानुसार जंगलात काही जळालेली झाडे आढळली. मात्र प्रसारमाध्यमांशी बोलण्याची अनुमती नसल्याने या रेंजरने रेकॉर्डवर येऊन ही माहिती दिली नाही. या भागातील पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव कार्यकर्त्यांच्या मते ही दुर्घटना म्हणजे अपघात नसून घातपात असण्याची शक्यता वाटते. कारण मृत हत्तींच्या शरीरांवर वीज कोसळल्याचेे कोणतेच लक्षण आढळत नाही. पर्यावरण कार्यकर्ते सौम्यदीप दत्ता यांनी वृत्तसंस्थांना सांगितले की, शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा करावी लागेल. परंतु, हत्तींना विषबाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
आशियाई हत्तींचे भारत हे मुख्य निवासस्थान आहे. एकूण आशियाई हत्तींपैकी 60 टक्के आशियाई हत्ती भारतात असून ही संख्या सुमारे 30 हजार असल्याचे सांगतिले जाते. यातील सहा हजार हत्ती एकट्या आसाम राज्यात आहेत. अन्नाच्या शोधात हे हत्ती अनेकदा जंगलातून मानवी वस्त्यांच्या आसपास येतात. अलिकडच्या काही वर्षांमध्ये हत्ती आणि माणूस यांच्यात संघर्ष घडल्याच्याही घटना घडल्या आहेत. हत्तींच्या मोठ्या कळपांकडून प्रामुख्याने शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असते. मानवी हस्तक्षेपामुळे संतापलेले हत्ती हिंसकही होण्याची भीती असते. शेतीचे नुकसान टाळण्यासाठी हत्तींवर विषप्रयोग झाल्याच्या घटना अत्यल्प असल्या तरी असे प्रकार घडले आहेत. दुसऱ्या बाजूला वन्यहत्तींच्या तडाख्यात सापडून काही माणसांनाही जीव गमवावे लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App