नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुरता सुलतानढवा झाला आहे. सुलतान ढव्यात जसा कोणाचा पायपोस कोणात उरत नाही, तशीच महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झाली आहे. एकीकडे ज्यांचे राजकीय अस्तित्व अजून मूळातच तयार व्हायचे आहे. किंवा ज्यांचे राजकीय अस्तित्व अतिशय तोळामासा आहे, असले दोन पक्ष महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या 288 आणि 250 जागा लढाईची भाषा करत आहेत, तर जे महाराष्ट्रातले “बडे” आहेत, ते 70 – 80 किंवा अगदी टोकाला जाऊन शंभर किंवा सव्वाशे मध्ये खेळणार आहेत!! Manoj jarange and raj thackeray to contest more seats than BJP, Congress, uddhav thackeray and sharad pawar
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर आगपाखड करत भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला पाडण्याचे आव्हान दिले. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्राच्या 288 जागा लढवण्याची घोषणा करून टाकली. ज्यांचा मूळात कुठलाच राजकीय पक्ष अस्तित्वात नाही, ते मनोज रंगे 288 जागा लढवण्याची भाषा करत आहेत. ते उमेदवार आणणार कुठून??, ते किती सक्षम असणार??, ते निवडून येण्यासाठी उभे करणार की दुसऱ्या उमेदवारांना पाडण्यासाठी उभे करणार??, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे अधांतरी आहेत. भाजपच्या उमेदवारांना पाडण्याची मनोज जरांगे यांची इच्छा आहे, पण त्यासाठीचे नेमके प्लॅनिंग काय?? याविषयी मात्र प्रचंड गोंधळ आहे आणि हाच नेमका सुलतान ढवा आहे.
दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 225 ते 250 जागा लढवण्याची भाषा करून स्वबळाचे दंड थोपटले आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला. मनसेचा एकही उमेदवार उभा केला नाही, पण आता मात्र महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही फाट्यावर मारून राज ठाकरे 225 ते 250 जागा लढवणार आहेत. त्यांनी यापूर्वी स्वबळ आजमावले. भरपूर उमेदवार उभे केले, तेव्हा त्यांचा 1 आमदार निवडून आला, असा टोमणा त्यांना काँग्रेसने मारला. असे टोमणे लोक मारतील, पण आपण स्वबळावर निवडणूक लढवायचीच, असे त्यांनी आजच्याच मेळाव्यात सांगितले देखील होते.
पण राज ठाकरे यांच्याकडे निदान अधिकृत पक्ष तरी आहे, ज्याला स्वतःताचे इंजिन नावाचे चिन्ह आहे. पण जरांगेंकडे स्वतःचा पक्ष नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कुठले चिन्ह असण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. त्यामुळे जरांगे 288 उमेदवार उभे करणार की तुतारी नावाच्या चिन्हाला मनुष्यबळाचे इंधन पुरवणार??, हा कळीचा सवाल आहे. कारण खुद्द जरांगे यांच्या आंदोलनाला विविध प्रकारचे इंधन तुतारीनेच पुरविले होते आणि आहे.
एकीकडे संघटना आणि अधिकृत पक्ष नसलेले जरांगे 288 जागा लढवण्याची भाषा करताहेत, दुसरीकडे तोळामासा संघटन असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे 225 ते 250 जागा लढवण्याची भाषा करत आहेत, पण महाराष्ट्रात सध्या 1 नंबरछा असलेला पक्ष भाजप महायुतीत 100 ते 125 जागांच्या रेंजमध्ये निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. कारण अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना उरलेल्या जागा सोडणे त्यांना भाग आहे. त्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी 70 आसपास, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही 70 च्याच आसपास आणि उरलेल्या जागा भाजपच्या वाटायला येण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीचे यापेक्षा फारसे वेगळे चित्र नाही. ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात अगदी समसमान जागावाटप झाले, तरी प्रत्येक पक्ष 70 – 80 च्या रेंजमध्ये येऊन ठेपतो. या सगळ्या पक्षांचे वैशिष्ट्य असे की त्यांच्याकडे स्वतःच्या विशिष्ट ताकदवान संघटना, अधिकृत पक्ष आणि अधिकृत चिन्ह आहेत, पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुलतान ढवा असा की विशिष्ट ताकद राखून असलेले पक्ष आणि नेते 70 – 80 च्या रेंजमध्ये किंवा अगदी काटोकाठ 100 – 125 च्या रेंजमध्ये खेळणार आहेत आणि ज्यांच्याकडे संघटना नाही, अधिकृत चिन्ह नाही किंवा तोळामासा संघटना आहे, ते मात्र 250 आणि 288 ची लढण्याची भाषा करत आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या राजकारणाच्या इतिहासात आत्तापर्यंत कधीही न घडलेला सुलतान ढवा असा घडतो आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App