लतादीदींवर आपले वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा प्रचंड प्रभाव होता. त्या अनेक मुलाखतींमध्ये अत्यंत अभिमानाने आणि कृतज्ञतेने वारंवार आपल्या वडिलांच्या देदीप्यमान सांगीतिक वारशाचा उल्लेख करत असत. lata mangeshkar special topic
अशाच एका मुलाखतीत त्यांनी मास्टर दीनानाथ यांनी आपल्याला काय दिले?, याची कहाणी सांगितली होती. मास्टर दीनानाथ यांचा मृत्यू 24 एप्रिल 1942 रोजी पुणे मुक्कामी झाला. मास्टर दीनानाथ उत्तम ज्योतिषी होते. त्यांना स्वतःचा मृत्यू कळला होता. त्यांनी आपल्या पत्नी माई मंगेशकर यांना मृत्यूपूर्वी आठ दिवस आपल्या मृत्यूची नेमकी वेळ सांगितली होती. आणि त्यांनी सांगितलेल्या वेळेनुसारच त्यांचा मृत्यू घडून आला होता.
Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, पण आणखी काही दिवस आयसीयूमध्येच राहणार
पण मृत्यूच्या आधी पाच – सहा दिवस मास्टर दीनानाथ यांनी लतादीदींच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाची घटना घडवून आणली. त्या दिवशी दीनानाथांनी लतादीदी यांना आपल्या जवळ बोलवले. त्या अवघ्या बारा वर्षांच्या होत्या. पाठची भावंडे आणखी लहान होती. मास्टर दीनानाथ यांनी लतादीदी आणि त्यांच्या आई माई मंगेशकर यांना सांगितले, की मी तुमच्यासाठी काही मागे ठेवले नाही. बँक बॅलन्स नाही. पैसाअडका नाही. दागदागिने नाहीत. पण ही चीजांची वही आणि हा तंबोरा मात्र तुमच्यासाठी ठेवला आहे. हा तंबोरा म्हणजे आपल्या घरातला साधुपुरुष आहे. त्याच्यावर धूळ पडू देऊ नका…!!
म्हणजे गाण्याचा रियाज सतत चालू ठेवा. हे गाणेच तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल, असे आशीर्वाद बाबांनी आपल्याला दिल्याच्या भावना लतादीदींनी मास्टर दीनानाथ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दूरदर्शनवर लोकसत्ताचे तत्कालीन संपादक आणि प्रख्यात पत्रकार माधव गडकरी यांना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केल्या होत्या.
मास्टर दीनानाथ असं म्हणत असत की बालगंधर्वांच्या गळ्यात गंधार आहे. तसाच लतादीदींच्या गळ्यातही गंधार आहे आणि हा गंधार चांगला लागला की लतादीदींच्या पायाशी लक्ष्मी असेल. तशीच लक्ष्मी बालगंधर्वांच्या गळ्यातील गंधारामुळे त्यांच्या पायाशी होती, ही अतिशय हृदयस्पर्शी आठवण देखील लतादीदींनी या मुलाखतीत सांगितली होती.
लतादीदी अवघ्या नऊ वर्षांच्या असताना मास्टर दीनानाथ यांच्याबरोबर पहिल्यांदा सोलापूर मध्ये जलशात गायला होत्या. त्यांची नाटकाची आवड पाहून मास्टर दीनानाथ यांनी कोठीवानांकडून लतादीदी आणि बहीण मीनाताई यांच्यासाठी “गुरुकुल” नावाचे नाटकही लिहून घेतले होते. या नाटकाचे संगीत दिग्दर्शन मास्टर दीनानाथ यांचे सहकारी आणि त्या वेळचे प्रख्यात विनोदी नट दिनकर कामण्णा ढेरे यांनी केले होते, याची आठवण देखील लतादीदींनी आवर्जून सांगितली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App