नाशिक : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक, पाठोपाठ विधान परिषद निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. Caste based census : nitish – lalu challenges BJP, but NCP is challenging Shivsena
नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जातिनिहाय जनगणनेसाठी जसे पाऊल उचलले आहे, तशीच मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन जाण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. फक्त फरक एवढाच आहे, की नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव जोडगोळीने भाजपला राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी बिहारमध्ये जातीनिहाय जनगणनेचा घाट घातला आहे, तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रहामुळे भाजपच्या आधी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे.
– जयंत पाटलांची माहिती
जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक असून, राष्ट्रवादीची तशी भूमिकाही आहे. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री, खासदार व प्रमुख नेत्यांची आढावा बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे काल आयोजित केली होती. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
– राष्ट्रवादीच्या आग्रहातून शिवसेनेची अडचण कशी?
महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादी मुळे भाजपची नंतर काय अडचण व्हायची ती होवो, पण पहिली अडचण शिवसेनेची होणार आहे. कारण शिवसेना हा एकमेव पक्ष महाराष्ट्रात असा आहे ज्याची राजकीय आणि सामाजिक जडणघडण ही खऱ्या अर्थाने जातीयतेच्या पलिकडची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय सामाजिक घडण मराठा समाज ही आहे. काँग्रेसची राजकीय आणि सामाजिक घडण अल्पसंख्याक, दलित, आदिवासी, मुस्लिम आणि उच्चवर्णीय हे राहिले आहेत, तर भाजपची सध्याची राजकीय आणि सामाजिक घडण हे प्रामुख्याने ओबीसी वर्गाची राहिली आहे. अशा स्थितीत शिवसेना मात्र मराठी आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यांवर वाढली आणि फोफावली. शिवसेनेमध्ये सर्व जातीय घटक सामील झालेत, पण त्यामध्ये जातीय वीण बऱ्यापैकी सैल राहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत प्रामुख्याने प्रस्थापित जातीनिहाय गटांच्या विरोधात संघटन उभे केले. ते आजही टिकून आहे.
– शिवसेनेच्या घडणीवर आघात
अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीनिहाय जनगणनेचा आग्रह हा प्रथम शिवसेनेच्या राजकीय आणि सामाजिक घडणीवर आघात करणारा ठरू शकतो. शिवसेनेने प्रस्थापित जातीनिहाय गटा विरोधात उभे केलेले संघटन अस्वस्थ होऊन बिखरू शकते. शिवसेनेचे मराठी माणसाचे आणि हिंदुत्वाचे अपील संघटनात्मक पातळीवर पातळ होऊ शकते. आणि अंतिमतः त्याचा प्रतिकूल परिणाम शिवसेनेच्या संघटनेवर होऊ शकतो.
जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरून राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे नेमका हा नवा पेच उभा करू पाहत आहे. आता हा पेच मुख्यमंत्री कसा सोडवतात?? हे पाहणे महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरणार आहे. कारण यात जातीनिहाय होणार का? झाली तर या जनगणनेचा अधिकृत निष्कर्ष काय येतो? यापेक्षाही पक्षीय तिकीटवाटपाची गणिते त्यात अधिक दडली आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App