अरूण जेटली, सुषमा स्वराज यांच्या मृत्यूवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्सनली टार्गेट करून डीएमकेचे नेते तामिळनाडूच्या निवडणूकीत ऐन मोक्याच्या क्षणी फसलेत… मोदींना पर्सनल टार्गेट करणे, हे डीएमकेसाठी बरेच महागात पडण्याची चिन्हे आहेत… ओपिनियन पोलमधून एकतर्फी वाटणारी निवडणूक इक्वल फूटिंगवर येतान दिसते आहे… आणि जेव्हा निवडणूक इक्वल फूटिंगवर येते तेव्हा मोदी कसा मास्टर स्ट्रोक मारतात, हे देशात अनेकदा दिसले आहे. udaynidhi stalin insults PM narendra modi, arun jaitley and sushma swaraj, both families gave befitting reply to udaynidhi maran
जी तामिळनाडू विधानसभेची निवडणूक स्थानिक पातळीवर आणि साधारण एकतर्फी चालली होती, तिला अचानक वादग्रस्त वक्तव्यांची झळ बसून ती राष्ट्रीय पातळीवरच्या चर्चेचा विषय बनली आहे.
एक प्रकारे “ये उद्योगा बस खांद्यावर” असले “उद्योग” डीएमके पक्षाच्या नेत्यांनी स्वतःहूनच केले आहेत. ए. राजा, दयानिधी मारन आणि उदयनिधी स्टॅलिन यांनी एकापाठोपाठ एक वादग्रस्त आणि बेछूट वक्तव्ये करून नुसते डीएमकेलाच अडचणीत आणलेय असे नाही, तर एम. के. स्टॅलिन यांच्या उभरत्या नेतृत्वाच्या गाडीला घुणा घालण्याचे काम केले आहे.
या निवडणूकीत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले आहे, की ज्याची अजिबात गरज नव्हती. वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे निवडणूक रणनीतीकार सांगून – सांगून थकले, की मोदींना पर्सनल टार्गेट करू नका. तसे केले तर त्यांचे काही बिघडत नाही, पण त्यांना पर्सनली टार्गेट करणे विरोधकांना महागात पडते. हातातोंडशी आलेला विजयाचा घास निसटतो… त्यांच्या ऐवजी दुसरी टार्गेट्स निवडा… पण नाही, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे विरोधक मोदींना पर्सनली टार्गेट करण्याचे “प्रयोग” करतात आणि फसतात… यात आता तामिळनाडूतल्या करूणानिधींच्या डीएमकेने स्वतःहून नंबर लावून घेतलाय.
आधी ए. राजांनी मुख्यमंत्री पलानीस्वामींना त्यांच्या आई – वडिलांवरून टार्गेट केले. निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई करून राजांवर ४८ तासांची प्रचारबंदी घातली. हा खरेतर डीएमके पक्षाच्या नेत्यांना सावध होण्याचा धडा होता. पण नाही… एकदा यशाची हवा यश मिळण्यापूर्वीच डोक्यात गेली, की त्याच्यासारखी दुसरी नशा नाही… त्या नशेत येऊनच दयानिधी मारन बोलले, “जयललिता मम्मी आणि नरेंद्र मोदी डॅडी”, आता अण्णाद्रमूकने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तिचा निकाल थोड्याच वेळात लागेल.
एवढे घडलेय, ते कमी की काय म्हणून दस्तुरखुद्द एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी तर सगळ्यांच्या वरकडी केली. त्यांनी माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि अरूण जेटली यांच्या मृत्यूसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जबाबदार धरले. म्हणाले, “मोदींच्या छळामुळे अरूण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाला.”… या आरोपासारखा तर दुसरा बेछूट आरोप नाही… मोदी – जेटली मैत्री सगळ्या जगाला माहिती आहे. त्या मैत्रीचे किस्से राजधानीत सांगितले जातात. स्वराज यांच्याविषयी मोदींनी वारंवार दाखविलेला आदरही सगळ्या देशाला माहिती आहे.
तरीही उदयनिधींनी उचलली जीभ लावली ताळ्याला… म्हणाले, मोदींच्या छळामुळे जेटली, स्वराज यांचा मृत्यू झाला… उदयनिधींचे हे वक्तव्य येताच या दोन्ही नेत्यांच्या कन्यांनी पुढे येऊन उदयनिधींचा चांगलाच समाचार घेतला… दोघींनी मोदींचे जेटली – स्वराज यांच्याशी कसे मधूर संबंध होते, याचे वर्णन केले आहेच. शिवाय आमच्या आई – वडिलांच्या नावाचा वापर तुमच्या राजकारणासाठी करू नका, असा इशाराही दिलाय.
जेटली आणि स्वराज यांच्या कुटुंबीयांना अकारण वादात ओढून उदयनिधी स्टॅलिन यांनी मुक्की खाल्ली आहे.
मतदान चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. प्रचार जेव्हा टिपेला नेऊन ठेवायला हवा, त्यावेळी डीएमकेचे नेते स्वतःहून कोलीत अण्णा डीएमके आणि पंतप्रधान मोदींच्या हातात देत आहेत.
जवळपास सगळ्याच ओपिनियन पोलमध्ये डीएमकेच्या विजयाची संधी दाखविण्यात आली आहे. अशा वेळी आपला विजय पक्का करण्याऐवजी डीएमकेचे नेते स्वतःहून त्या विजयाच्या मार्गात भगदाडे पाडत आहेत. मोदींना तर पर्सनल टार्गेट करणे पक्षाला मोठा तडाखा देण्याच्याच बेतात असल्याचे वाटायला लागलेय. कारण पुढच्या तीन दिवसांमध्ये प्रचार केंद्रीत ठेवायला मोदी – जेटली – स्वराज हा मुद्दा अण्णा डीएमके आणि भाजप यांना मिळाला आहे. ते याच मुद्द्यांभोवती प्रचार केंद्रीत ठेवतील आणि ऐन मोक्याच्या वेळी डीएमकेच्या नेत्यांनी केलेल्या या घोडचूकांचा फायदा नक्की घेतील… पण हे डीएमकेच्या नेत्यांना समजायला हवे ना…, यश मिळण्याच्या आधीच त्यांच्या डोक्यात गेलेली यशाची हवा तर निघायला हवी ना…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App