महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारला अडीच वर्षे पूर्ण होताना मंत्रिमंडळात काही फेरबदल आणि विस्तार करण्याच्या बातम्या मराठी प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत. मंत्रिमंडळातील फेरबदला संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आज चर्चा होणार असल्याच्या बातम्या आहेत. पण जणू काही हा मंत्रिमंडळातील फेरबदल हा ठाकरे – पवार आणि नाना पटोले यांच्या स्वतंत्र इच्छेनुसारच होणार आहे, असे या बातम्यांमधून मराठी माध्यमांनी भासवले आहे आणि फेरबदल करून पवार कशी “पॉवरफुल खेळी” करणार अशी मुत्सद्देगिरीची मखलाशी केली आहे…!!
पण प्रत्यक्षात मंत्रिमंडळातल्या फेरबदलाची आणि विस्ताराची नेमकी कारणे काय आहेत हे नीट लक्षात घेतले तर “बिटवीन द लाईन्स” न वाचता सुद्धा किंवा “मधली ओळ” न सांगता सुद्धा कोणालाही कळेल…!! राज्यातल्या मंत्रिमंडळातले अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोन महत्त्वाचे मंत्री तुरुंगात आहेत. हे दोघेही राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे अनिल परब यांचा नंबर लागण्याची शक्यता आहे. म्हणजे ठाकरे – पवार मंत्रिमंडळातले गृहमंत्री, अल्पसंख्यांक मंत्री हे तुरुंगात, तर परिवहन मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री तुरुंगाच्या वाटेवर अशी जर मंत्रिमंडळाची स्थिती होत राहिली तर मंत्रिमंडळात फेरबदल करण्याशिवाय दुसरा पर्याय काय उरतो…??, हा खरा राजकीय मेख असणारा सवाल आहे…!! अशा वेळी मंत्रिमंडळाच्या फक्त विस्ताराच्या बातम्या मराठी प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत. त्यातही ठाकरे – पवारांची काही “विशिष्ट मुत्सद्देगिरी” मीठ-मसाला लावून त्यांनी सांगितली आहे. पण यातली राजकीय अपरिहार्यता आणि केंद्रीय तपास संस्थांची टांगती तलवार याबद्दल कोणीही नेमके भाष्य केलेले दिसत नाही.
एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर केंद्रीय तपास संस्थांची कडक कारवाई होत असताना दुसरीकडे काँग्रेसमध्येच आपल्याच मंत्र्यांविरुद्ध प्रचंड नाराजी आहे. ती काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या कानावर घातली आहे. स्वतः नाना पटोले हे प्रदेशाध्यक्षपद सोडून राज्याच्या मंत्रिमंडळात जाऊ इच्छित आहेत. त्यामुळे काँग्रेस मंत्र्यांनी मधली अस्वस्थता ही देखील मंत्रिमंडळातल्या फेरबदलाला कारणीभूत ठरत आहे.
म्हणजे एकूण महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणावर असंतोष आणि अस्वस्थता असताना फेरबदल करणे अपरिहार्य आणि अनिवार्य ठरले आहे. या फेरबदलाला दुसरा पर्यायच नाही म्हणून मंत्रिमंडळात फेरबदल करावा लागतो आहे…!! मात्र ही वस्तुस्थिती सांगून तिचे विश्लेषण करण्याऐवजी मराठी माध्यमे ठाकरेंची आणि विशेषत: पवारांची मुत्सद्देगिरी “भाकरी फिरवणे” वगैरे भाषा वापरून मंत्रिमंडळाची अब्रू झाकण्याचा प्रयत्न करत आहेत आहेत…!! म्हणजेच ते आपली “पॅकेजी जबाबदारी” पार पाडताना दिसत आहेत…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App