नाशिक : राष्ट्रवादीतील भांडणे कमी पडली की काय, म्हणून कळलाव्यांनी भाजप – शिवसेनेत भांडणे सुरू केली, असे राजकीय चित्र आज समोर आले.
– रोहित पवारांचे भांडणांना खतपाणी
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पवार कुटुंबीय विरुद्ध इतर अशी भांडणे सुरू झाली. त्याला आधी रोहित पवारांनी खतपाणी घातले. सुनेत्रा पवारांच्या पत्राने त्यात तेल ओतले. पवार कुटुंबाच्या नेत्यांचे राजकीय बस्तान बसवण्यासाठी पटेल, तटकरे यांचे बस्तान उखडायचे डाव खेळून झाले. त्यावर दावे – प्रतिदावे झाले. खुलासे – प्रतिखुलासे झाले. रोहित पवारांना सत्तेच्या वळचणीला कुणी बसू दिले नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राडे घातले. वेगवेगळे हातखंडे वापरून सुनेत्रा पवारांचे आसन अस्थिर केले. पण त्यात ते यशस्वी झाल्याचे अजून तरी दिसले नाही. रोहित पवारांनी केलेली सगळी राजकीय वक्तव्ये आणि भाकिते केराच्या टोपलीत गेली.
– बच्चू कडूंनी लावली कळ
पण राष्ट्रवादी काँग्रेस मधली भांडण कमी पडली म्हणून की काय, विधान परिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केलेल्या बच्चू कडूंनी भाजप आणि शिवसेना यांच्यात काल्पनिक भांडणे लावून टाकली. आज म्हणे, कुणी सर्व्हे केला, तर एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पदासाठी पसंती मिळेल, असे सांगून बच्चू कडू यांनी भाजपमध्ये “काडी” टाकली. बच्चू कडू यांना नौटंकीछाप म्हणून भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेचा हवाला दिला.
– काही मिळाले नाही म्हणून लावल्या “कळा”
पुढच्या तीन वर्षांमध्ये निवडणुका नाहीत. त्यामुळे अनेकांचा पापड मोडलाय. त्यामुळे काहीही करून देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला भोके पाडायची. त्यासाठी खऱ्या खोट्या बातम्या पेरायच्या असले उद्योग रोहित पवार आणि बच्चू कडू यांच्यासारख्या असंतुष्टांनी केलेत. त्या पलीकडे या भांडणांना काही अर्थ नाही आणि त्यातून कुणाचा स्वार्थ साध्य होण्याची शक्यता नाही. कारण कुणाचाही स्वार्थ साध्य करण्याची क्षमता फक्त देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यात आहे. इतरांमध्ये नाही. पण कसाही करून स्वार्थ साधता येत नाही म्हणून “उद्योग” केल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही, अशीच रोहित पवार आणि बच्चू कडू या दोघांची अवस्था आहे.
– उदय सामंतांचे “उद्योग”
पण त्या पलीकडे जाऊन ज्यांना खरा “उद्योग” आहे, त्यांनाही दुसरा “उद्योग” करायची उबळ आल्याशिवाय राहिली नाही. म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपल्या जुन्याच आंदोलनाला नवी उकळी दिली. आतापर्यंत जेव्हा जेव्हा उदय सामंत हे मनोज जरांगेंना भेटले, त्यानंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाचे नाटक केले. यावेळी सुद्धा उदय सामंत मनोज जरांगेंना भेटले आणि जरांगेंनी नव्या आंदोलनाची घोषणा केली.
– राजकीय पिंड राष्ट्रवादीतच पोसला
उदय सामंत हे आज जरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असले, तरी त्यांचा राजकीय पिंड शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पोसला गेला होता. त्यामुळे काही ना काहीतरी “उद्योग” करण्याची सवय त्यांना आधीपासून होती. आता सुद्धा राष्ट्रवादीत वर्चस्वाची भांडणे सुरू असताना उदय सामंत मनोज जरांगेंना भेटायला गेले आणि त्या पाठोपाठ जरांगे यांनी आंदोलनाची घोषणा केली. त्यात बरेच काही राजकारण शिजलेले सगळ्या महाराष्ट्राला दिसले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App