विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. महायुतीपासून फारकत घेत मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेणाऱ्या राष्ट्रवादीने आज 37 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. या निवडणुकीची संपूर्ण धुरा नवाब मलिक आणि आमदार सना मलिक यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून, पक्षाने एकूण 100 जागा लढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जाहीर झालेल्या पहिल्या यादीतील उमेदवारांना उद्यापासूनच अधिकृत एबी फॉर्मचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.Ajit Pawar
या पहिल्या यादीत नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यात त्यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक 165 मधून, तर बहीण डॉ. सईदा खान यांना प्रभाग क्रमांक 168 मधून मैदानात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कप्तान मलिक यांचा मूळ प्रभाग 168 हा महिलांसाठी राखीव झाल्याने, त्यांनी स्वतःसाठी नवीन प्रभाग निवडला असून त्यांच्या जागी आपली सून बुशरा नदीम मलिक यांना प्रभाग 170 मधून उमेदवारी दिली आहे.Ajit Pawar
आमदार सना मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत एकूण 100 उमेदवार उभे करणार आहे. पहिल्या 37 उमेदवारांची घोषणा झाली असून, उद्यापासूनच या उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ चे वाटप केले जाणार आहे. महायुतीतील इतर मित्रपक्षांपासून फारकत घेत राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे उमेदवार देण्यास सुरुवात केल्यामुळे मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत आता चुरस वाढली आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या युत्या आणि आघाड्यांचे चित्र पूर्णपणे बदलले असून राजकीय समीकरणे कमालीची गुंतागुंतीची झाली आहेत. विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 52 जागांची मागणी केली होती, परंतु ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये त्यांच्या पदरात केवळ 10 ते 12 जागाच पडल्या आहेत. या अल्प जागावाटपामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिकिटे कापली गेल्याने पक्षात मोठी नाराजी पसरली असून, या संधीचा फायदा उठवत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मुंबईत 100 जागांवर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप-शिवसेना शिंदे गटात 20 जागांचा पेच
दुसरीकडे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना शिंदे गट युतीचे जागावाटप आता अंतिम टप्प्यात आले असून, एकूण 227 जागांपैकी 207 जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 128 तर शिवसेना 79 जागा लढवणार असून, उर्वरित 20 जागांचा पेच राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या चर्चेनंतर लवकरच सुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपकडून निवडणुकीची तयारी वेगवान करण्यात आली असून उद्या तेजस्वी घोसाळकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर पक्षाने आणखी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. जागावाटपाचा हा अंतिम तोडगा निघाल्यानंतर पुढील काही तासांतच उमेदवारांची संपूर्ण अधिकृत यादी जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App