विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Manoj Jarange मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरूवारी पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडे हे शेखचिल्ली आहेत. ते ज्या फांदीवर बसतात, तीच फांदी तोडतात. त्यांनी नार्को टेस्टच्या मागणीवरून मागे हटू नये. या चाचणीतून तरी त्यांनी महादेव मुंडे यांचे काय केले, बापू आंधळेंचे काय केले, गित्तेचे काय केले व संतोष देशमुख प्रकरणात काय केले हे समोर येईल. नार्टो टेस्टमधून त्यांनी अंधारात किती चाली रचल्या हे ही सत्य समोर येईल, असे ते म्हणाले.Manoj Jarange
मनोज जरांगे यांनी गुरूवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी त्यांच्या घातपाताचा कथित कट रचल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, मी लपत नाही. मला लपता पण येत नाही. राजकारणाचा मला नादच नाही. पण समाजाच्या जिवावर उठल्यानंतर मी दम खात नाही. तुम्ही तुमचे राजकारण करा. मोठे व्हा. मराठ्यांवर अन्याय का करता? तुम्ही अन्याय केला. मग मी सोडणार नाही. तुम्ही कितीही जहागीरदार असला तरी मी सोडणार नाही. मला आत्ताच्या प्रकरणातही राजकारण आणायचे नाही.Manoj Jarange
मी शेतकऱ्याचा मुलगा, मला खोटे चालत नाही
माझ्या घातपाताच्या प्रकरणात मी नार्को टेस्टची मागणी केली नाही. त्या (धनंजय मुंडे) माणसाने केली. आत्ता लपायचे नाही. चला नार्को टेस्टला. जातवान वागायचे. त्यांनी टेस्टची तयारी दर्शवल्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी अर्ज केला. माझा अर्ज चुकीचा असेल, तर तुम्ही कसाही लिहून आणा. कोर्टात चला, हायकोर्टात चला, राज्यपालांकडे चला, राष्ट्रपतींकडे चला, कुठेही चला. तिथे सह्या केल्या नाही तर दोन बापाची अवलाद. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आम्हाला खोटे चालत नाही.
घातपाताचा कट स्वतः धनंजय मुंडेंनी रचला
मनोज जरांगे म्हणाले, राजकारण सुरूच असते. पाडापाडीही सुरू असते. एकमेकांवर टीका करणेही सुरू असते. पण तुम्ही माझ्या घातपातापर्यंत गेलात. आता तुम्हाला सुट्टी नाही. चल, लपू नको. एका बापाचे असल्यासारखे नार्कोटेस्टला निघायचे. प्रस्तुत प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कांचन साळवी नामक तरुणाची मला ओळखही नाही. त्यांनी त्याला त्याच्या घरी येऊन परळीला नेले. त्याने सांगितले की, आम्ही परळीच्या बैठकीला गेलो होतो. याचा अर्थ खुनाचा कट परळीत शिजला.
हा कट स्वतः धनंजय मुंडे यांनी रचला. हे दोन-चार आरोपींनी मिळून रेस्ट हाऊसमध्ये बसून हा कट शिजवला. हेच सत्य आहे. ते समोर येईल. आता फक्त अजित पवारांनी सांभाळून राहावे. त्यांनी खोडा घालू नये. विनाकारण त्यांना बळ देण्याचे काम करू नये. अन्यथा मोठा घोळ होईल. प्रत्येक वेळेस वाचवायचे नाही. तुमची व माझी नार्टो टेस्टची तयारी आहे. मग प्रॉब्लेम काय? मी नार्कोटेस्ट करतो. त्याहून अधिक मोठी चाचणी असेल तर त्यालाही सामोरे जाण्याची माझी तयारी आहे.
मुंडेंनी या टोकापर्यंत जायला नको होते
जरांगे पुढे म्हणाले, हा विनोदाचा भाग नाही. धनंजय मुंडे यांनी या टोकाला जायला नको होते. विरोध करणे सुरूच असते. पण तू मुळावरच उठायला लागला. मी एवढा सोपा आहे का? मला गोळ्या, औषध घालण्यास सांगता. बाया (महिला) जेवणात औषध घालतात. त्यामुळे ते आता महिलांचे धंदे करत आहेत. मराठा जिंकण्यासाठी मी जिद्दीने लढलो. जिद्दीने लढणाऱ्याला त्यांनी हरवायचे प्रयत्न न करता, खून करण्याचे कट रचले. मराठ्यांविषयी कट रचले. मराठ्यांना हलवण्यात कुणाची हिंमत नाही. त्यामुळेच ते कट कारस्थान रचत आहेत.
हा (धनंजय मुंडे) अलीबाबा नव्हे तर शेखचिल्ली आहे. ज्या झाडावर बसतो, तेच झाड तोडतो आणि फांदीवरून पडतो. त्यांनी मला नार्को टेस्टचे आव्हान दिले. माझी तयारी आहे. मी मुख्यमंत्र्यांनाही सांगितले, आता यात मागे हटायचे नाही. अन्यथा मी तुम्हाला अडचणीत आणणार. तुम्ही खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करायचे नाही. त्यांनी दिलेल्या आव्हानानुसार नार्को टेस्ट होऊ द्या. माझ्यामुळे त्यांचे सर्वकाही महादेव मुंडे यांचे काय केले, बापू आंधळेला काय केले, गित्तेला काय केले, संतोष देशमुख प्रकरणात काय केले हे समोर येईल. अंधारात बसून किती चाली रचल्या हे ही समोर येईल.
धनंजय मुंडेंमुळे वंजारी समाजालाही सूख नाही. एक चांगली जात याच्यामुळे बदनाम होत आहे. आता त्यांना हा रस्त्यावर उतरवत आहे. म्हणजे पुन्हा गरिबांना त्रास झाला. गरिबांच्या झुंजी लावून हा दूर बसणार नाही. आता वंजारी, मराठा, दलित, मुस्लिम, बहुजन आदी कुणीच नको. आपण दोघेच पाहू. तू नार्को टेस्टला चल, असे जरांगे म्हणाले.
संपूर्ण मराठवाडा आरक्षणात जाणार यात शंका नाही
मराठवाड्यात काही ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र जारी करण्यात अडचणी येत असल्याची बाब पत्रकारांनी यावेळी जरांगेंच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ते म्हणाले, यात तथ्य आहे. या प्रकरणी अनेक तक्रारी येत आहेत. नोंदी असूनही प्रमाणपत्र दिले जात नाहीत. उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितले. मंत्री संजय शिरसाट यांच्या कानावरही आम्ही ही गोष्ट घातली. त्यांनी आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर कामाला वेग येईल असे आश्वासन दिले आहे. संपूर्ण मराठवाडा आरक्षणात जाणार यात शंका नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App