देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या दुसऱ्या कारकीर्दीत जमीन गैरव्यवहारांचे दोन प्रकार समोर आले. त्यापैकी 230 कोटी रुपयांचा व्यवहार रद्द झाला, पण आता 300 कोटींचा व्यवहार रद्द होणार का??, असा सवाल समोर आलाय.Ajit Pawar’s son parth corruption issue
पुण्याच्या जैन होस्टेलच्या जमिनीचा व्यवहार झाला त्यामध्ये 230 कोटी रुपये बिल्डर गोखलेंनी अदा केले. पण तो एकूणच व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला. कारण 1500 ते 3000 कोटी रुपयांची जमीन 230 कोटी रुपयांना विकली, असा त्यात आरोप झाला. शिवाय ती जमीन सार्वजनिक ट्रस्टची होती आणि आहे त्याचबरोबर तिथे मंदिर आहे तरी देखील तो व्यवहार झाला. त्यामध्ये केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव गोवले गेले. त्यांनी सगळी सरकारी यंत्रणा हलविल्यामुळे 1500 ते 3000 कोटी रुपयांची जमीन त्यांच्याच पार्टनरला फक्त 230 कोटी रुपयांना मिळाली, असा आरोप शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केला. त्या व्यवहारातले काळेबेरे धंगेकर यांनी बाहेर काढले. त्यामुळे त्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप केल्याचे बोलले गेले. शेवटी तो व्यवहार रद्द करण्यात आला. पण एकूणच ते प्रकरण मुरलीधर मोहोळ यांना चांगलाच राजकीय दणका देऊन गेले.
– अजितदादांच्या मुलाचा भ्रष्टाचार
दुसरीकडे अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्या 1800 कोटी रुपये किंमत असलेली महार वतनाची जमीन फक्त 300 कोटी रुपयांना विकत घेतली. त्यावर फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी दिली, असा आरोप विधान परिषदेतले माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. त्यांनी त्या संदर्भात सविस्तर पोस्ट लिहिली. पण यात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा पार्थ पवार यांनी केला. पण या व्यवहार/ गैरव्यवहाराच्या बातमीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घेऊन या व्यवहारा संदर्भात सगळी माहिती मागविली. त्यामध्ये कुठला गैरव्यवहार आढळल्यास ते तो संपूर्ण व्यवहार रद्द करणार असल्याचे सांगितले.
– गंभीर सवालांची उत्तरे कधी मिळणार??
मूळात संबंधित जमीन पुण्यातल्या कोरेगाव पार्क सारख्या प्रतिष्ठित भागातली असून ती महार वतनाची असल्याचे कागदोपत्री अंबादास दानवे यांनी दाखवून दिले. त्या जमिनीची किंमत 1800 कोटी रुपये भरत असल्याचाही त्यांनी दावा केला. पण तिचा व्यवहार मात्र 300 कोटी रुपयांमध्ये झाला. मुळात महार वतनाच्या जमिनीचा व्यवहार होत नसताना हे कसे घडले, याची चौकशी होईल का?? हा महत्त्वाचा सवाल आहे. त्याचबरोबर जैन होस्टेलच्या जमीन व्यवहार/ गैरवहार या विषयाचा पाठपुरावा रवींद्र धंगेकर यांनी केला. ते त्या विषयाच्या मागे हात धुवून लागले होते. तसा पाठपुरावा अंबादास दानवे करणार का??, हा त्या पुढचा कळीचा सवाल आहे.
– अजितदादांना दणका देणार का??
जैन हॉस्टेलच्या व्यवहारात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष घातल्याचे बोलले गेले किंबहुना केंद्रीय नेतृत्वानेच लक्ष घालून वेळीच तो व्यवहार रद्द करून भाजपची संभाव्य राजकीय हानी टाळली. आता महार वतन जमीन व्यवहार किंवा गैरव्यवहारात भाजपचे केंद्रीय नेतृत्व लक्ष घालणार का? आणि फडणवीस सरकारची संभाव्य राजकीय हानी टाळणार का?? त्याचबरोबर अजित पवारांना दणका देणार का??, हे दोन गंभीर सवाल आहेत. या सवालांची उत्तरे लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App